राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा चालू आहे. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही पक्षातील नेत्यांनी या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. अशातच आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही या युतीवर भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पत्रकाराशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आदित्य यांनी म्हटले की, राज्यावर अनेक अत्याचार होत आहेत. यात कुठेतरी बदल घडवण ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे जे पक्ष महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंच सूचक विधान
याआधी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘बघु, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’. मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल? यावर प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला.शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ”.
ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक- किशोरी पेडणेकर
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या बाजूने या युतीसाठी सकारात्मक आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. ‘2022 साला महाराष्ट्रात राजकाराणाचा चिखल झाला. यामुळे नागरिक तसेच सगळ्यांनाच त्रास होत आहे. कारण परप्रांतीय लोकांचे प्राबल्य वाढत आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आमच्यापर्यंत असे सगळेच लोक या युतीसाठी सकारात्मक आहोत. संजय राऊतांनी तर आता मागे वळून पाहायचं नाही, असं सांगितलं आहे. मागे वळून पाहिलं की चिखल दिसेल. त्यामुळे मागे पाहायचं नाही पुढे पाहुया’, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गट मनसेशी युती करायला सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.