Ravikant Tupkar : तुम्ही सारखी भूमिका बदलता त्यावर कोणती समिती नेमायची, तुपकारांचा शेट्टींना सवाल
पुणे, : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली त्यांनतर आज पत्रकार परिषद घेत राजु शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर रविकांत तुपकर यांनी गंभीर टीका करत माझा काय गुन्हा असा सवाल राजू शेट्टींना विचारला आहे. कोल्हापुरात 3 तालुक्यापुरती असलेली संघटना आम्ही राज्यभरात नेली, राजू शेट्टी किती ग्रेट आहेत हे लोकांना सांगितलं. पण आजची आमची बैठक फेल जावी म्हणून माझी घाई घाईत हकालपट्टी केली आहे असा आरोप रविकांत तुपकर यांनी लगावला आहे.

तुपकर काय म्हणाले

२००२ – २००३ ला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत काम करायला सुरुवात केली. २००७ च्या दरम्यान राजू शेट्टी यांच्या संघटनेत आलो राज्याच्या कोनाकोपर्‍यात मी आणि सदाभाऊ खोत यांनी नेली स्वाभिमानी शेतकरी संघटना पोहचवली, पण आता आमची गरज संपली म्हणून दोघांना बाजूला केले आहे असा आरोप तुपकरांनी लगावला. पुढे तुपकर म्हणाले,शेतकरी संघटनेचा लाल किल्ला तळहाताच्या फोडप्रमाणे जपले. राजू शेट्टी किती ग्रेट आहेत हे लोकांना सांगितलं. आजची आमची बैठक फेल जावी म्हणून माझी घाई घाईत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र ही बैठक चळवळीची पुढली दिशा ठरवण्यासाठी होती.

२०१४ ला मला चिखली मधून लढण्याचे आदेश दिले होते मात्र ऐनवेळेस मला सांगण्यात आलं आपली भाजप सोबत युती झाली आहे तू लढू नको, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ यांनी सांगितलं तुझं बलिदान वाया जाऊ देणार सरकार आल्यावर तुला महामंडळ देऊ, प्रत्येक वेळेस तयारी करायला लावायचं आणि त्याबद्दल्यात काहीतरी घ्यायचं ही त्यांची सवय असा घणाघात तुपकरांनी केला आहे.

२००२ साली शरद जोशी यांनी तुम्हाला झेडपी सदस्य केले, नंतर भाजप सोबत युती झाल्याने आमदारकीची जागा न सुटल्याने तुम्ही शरद जोशींना सोडल आणि शरद जोशींच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही दर पाच वर्षाला भूमिका बदलता त्यावर कोणती समिती नेमले.एखादा नेता मोठा होत असेल तर त्याचे पाय खेचायचे इतकेच जमते. माझी संघटनेतून हकालपट्टी केली पण शेतकऱ्यांच्या मनातून हकालपट्टी करू शकत नाहीत असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावला आहे.