मुंब्रा दिवा रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचा संताप, म्हणाले आपल्या देशात…

मुंबईत आज सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून ८ प्रवासी पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वेमंत्री काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

रस्ते नसल्याने पार्किंग नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्राफिक अडलं जाते. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या अनेक ठिकाणी ही समस्या आहे. जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही. अशी आपल्या शहराची अवस्था झाली आहे. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही.

आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय तुम्हाला माहिती नाही. फक्त मेट्रो आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा करत आहेत याने प्रश्न सुटणार नाही.

मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? टू व्हीलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का, त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)