Rain News: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले, लोकलचा खोळंबा, रेल्वेच्या प्रवाशांना सक्तीचा शॉवरबाथ!

मुंबई: राज्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. कोकणासह मुंबईतही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोकण आणि मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील ३ ते ४ तासांत मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
Rain News: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, ४०० नागरिकांचे स्थलांतरण, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगर, जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बीड, नांदेड, नंदुरबार, हिंगोली, लातूर, परभणी या जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. याचा परिणाम विधानसभेचे कामकाजावरही दिसून आला आहे. पावसामुळे विधानसभेचे कामकाग दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. तर पावसाचा सर्वात मोठा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. मंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. यामुळे मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

रेल्वेच्या प्रवाशांना सक्तीचा शॉवरबाथ

कुर्ला स्थानकातील प्लॅटफॅार्म नंबर ५ आणि ६ च्या काही भागावर गेल्या काही महिन्यांपासून छत नाही. त्यामुळे कडकडीत उन्हात प्रवासी भाजून निघत होते, तर पावसात सक्तीचा शॅावरबाथ घडतो आहे. या भागात येणाऱ्या डब्यांमध्ये चढण्यासाठी कोणी थांबत नाही. त्यामुळे या भागाच्या आसपासच्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. यामुळे प्रवासी त्रासले आहेत. तेथे येणाऱ्या प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पावसामुळे वीज पुरवठा खंडित

मुंबईत पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. चकाला, सांताक्रूझ भागात काही ठिकाणी वीज उपकेंद्रात पाणी साचल्याने वीज प्रवाह अर्धा तास खंडित करण्यात आला होता. नागरी निवारा, दिंडोशीत पावसामुळे केबल शॉर्ट होऊन वीज खंडित झाली होती.