मुंब्रास्थानकात साल २०१६ रोजी देखील असाच अपघात झाला, तरीही दुर्लक्ष झाल्याचा रेल्वे संघटनांचा आरोप

मुंब्रा येथे पाचवी आणि सहावी मार्गिका वाढवली तेव्हा आम्हाला सांगितलेलं होतं की लोकल ट्रेन वाढविण्यात येणार आहेत. मात्र लोकल
ट्रेन न वाढवता चौथ्या मार्गिकेवरती वरती मेल आणि एक्सप्रेस गाड्या सुरू केलेल्या आहेत. कळवा-ऐरोली एलिवेटेड सारखा प्रकल्प बंद करून ठेवला आहे. लोकल ट्रेनला बाजूला ठेवत एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे.यामुळे प्रवाशांची गर्दी स्थानकावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आणि या गर्दीमुळे लोकं पडून त्यांचा जीव जात आहेत. 2016ला ही असाच अपघात झाल्यानंतर दिल्लीच्या रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही तक्रारी केल्या होत्या. याला कारणीभूत डीआरएम सह जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी मुंबई रेल्वे संघटना उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी दिली आहे.

आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जात आहोत…

लोकलला ऑटोमेटिक दरवाजाच्याच्या लोकलसह आणि विविध सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे प्रशासनाने त्या सूचना मान्य करत प्रवाशांची सुरक्षा करावी अशी मागणी आम्ही केली होती. दिल्ली रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्र आणि मुंबईच्या रेल्वेत हस्तक्षेप करीत जे निर्णय घेत आहेत ते घेऊन नये, मुंबईचे निर्णय मुंबईच्या लेव्हलला घ्यावे अशीही मागणी सिद्धेश देसाई यांनी केली आहे. मुंबई कोस्टल रोडवर जेवढे प्रवासी प्रवास करीत नाहीत. तेवढे प्रवासी रेल्वेतून करतात. मग रेल्वेचे महत्त्वाचे प्रकल्प सोडून इतर प्रकल्प तुम्ही कसे काय पूर्ण करतात.असा सवाल रेल्वे संघटनेने केला आहे. मुंबईकर कर देऊन मरत असतील तर याला जबाबदार कोण? हे थांबणार कधी याचं उत्तर देणार कोण ? अशी मागणी देसाई यांनी केली आहे. संध्याकाळी रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही तातडीने भेटणार आहोत असेही ते म्हणाले.
उल्हासनगरच्या केतन सरोजचा मुंब्रा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू!

हातातोंडाशी आलेला केतन गेला

मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात उल्हासनगरच्या केतन सरोज या २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या अशा अकाली मृत्यूमुळे उल्हासनगरच्या हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली आहे. ठाण्याच्या आशर आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या सरोज याने सोमवारी सकाळी कामावर जाण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून कसारा सीएसएमटी लोकल पकडली. पण मुंब्रा स्टेशनमध्ये झालेल्या अपघातात केतन लोकलमधून पडला आणि त्याचा मृत्यू झाला. केतनसोबत त्याच परिसरात राहणारा मित्र दीपक शिरसाट हा देखील त्याच डब्यात प्रवास करीत होता. केतन पडल्यावर त्याने २ ते ३ वेळा लोकल थांबवण्यासाठी चेन ओढली गेली. पण लोकल थेट ठाण्याला जाऊन थांबली.

त्यामुळे दीपक शिरसाठ याने ठाण्याहून पुन्हा मुंब्रा स्टेशन गाठलं आणि केतनला तत्काळ रुग्णवाहिकेने कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेलं, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. केतनचं बी.कॉम पर्यंत शिक्षण झालं होतं. घरातील मोठा मुलगा म्हणून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच्या वडिलांचे नाव दिलीप सरोज असून ते वायरमन म्हणून काम करतात. सरोज कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असून केतनच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्नेहा दोंडे जखमी झाल्या

स्नेहा दोंडे या टिटवाळा परिसरात राहणाऱ्या असून त्या टिटवाळाहून मुंबईकडे नेहमी प्रवास करतात. स्नेहा या मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. रेल्वे अपघातात स्नेहाच्या हातापायावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. स्नेहावर सध्या कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजची रेल्वे दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रेल्वे प्रशासनाने यावर आधीच उपाय करायला हवे होते.पण सध्या ‘अमृत भारत’ च्या नावाने फक्त स्थानकांचा बाहेरून लुक बदलण्याचा कार्यक्रम सुरु आहे.पण स्थानकांच्या आतल्या बाजूने सोयीसुविधांची वाणवा पहायला मिळते.दररोज अनेक प्रवाशांचा दिवा – मुंब्रा दरम्यान मृत्यू होतो हे प्रशासनाला माहित नाही का?  या सर्व अपघातामध्ये डोंबिवलीचे प्रवासी सर्वाधिक असतात. प्रशासन सर्व लोकल पंधरा डब्याच्या का नाही सुरू करत? असा सवाल डोंबिवलीकर प्रवासी बळीराम राणे यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)