Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एका दैनिकात थेट लेख लिहून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवले आहे. ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने झालेली नाही. काहीतरी काळंबेरं आहे, असा मोठा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
निवडणूक आयोगाने नेमकं काय सांगितलं?
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली आहे. तसेच निवडणूक घेताना पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मदतारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
त्यावेळी कोणीही तक्रार केली नाही- निवडणूक आयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरमम्यान मतदारांची संख्या अचानक वाढली. तसेच निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. हा दावादेखील निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. निवडणुकीसाठीचे उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या एजंट्सच्या उपस्थितीत मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. काँग्रेस तसेच काँग्रेसच्या अधिकृत एजंट्सनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर तसेच निवडणूक निरक्षकांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नव्हती, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
राहुल गांधींनी थेट आकडेवारीच दिली
दरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा दावा करताना काही आकडेवारी सादर केली आहे. थेट आकडेवारीच सादर केल्यामुळे राहुल गांधीच्या आरोपांना वजन प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.