Pune Tourism : पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचा विचार करताय? अपघात टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या, वन विभागाचे आवाहन

प्रतिनिधी, पुणे : पहिल्याच पावसात पुण्यालगतच्या डोंगरदऱ्यांवर झालेली गर्दी पाहता, पर्यटकांनी गडकिल्ले, जंगल वाटांवर होणारी पर्यटकांची गर्दी, त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी सुट्टीचा दिवस टाळून पावसाळी पर्यटनाचे नियोजन करावे. अनवट वाटांवर जाताना स्थानिक गाइडला बरोबर नेण्यासह पाण्याशी खेळू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य आणि धबधब्यांची मजा लुटण्यासाठी सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅलीसह लगतच्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला जातात. बेशिस्त पर्यटकांमुळे रस्त्यावर कोठेही केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होतेच; शिवाय अर्धवट माहितीच्या आधारे धुक्याच्या वाटांमधून डोंगरदऱ्यांमध्ये फिरणाऱ्या पर्यटकांमुळे दर वर्षी अनेक पर्यटक वाट चुकतात. पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पर्यटक धबधब्याबरोबर वाहत दरीत पडल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या या अनियंत्रित पर्यटनाला अटकाव घालण्यासाठी वन विभागाने या वर्षी जूनमध्येच जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

Nashik News : रोजगार मेळाव्यांतून सहा हजार बेरोजगारांना नोकऱ्या, जिल्ह्यातील अठरा हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया

उपद्रवी पर्यटकांवर होणार कारवाई

पर्यटकांची गर्दी वाढल्यानंतर ताम्हिणी अभयारण्यालगतच्या वनसंरक्षण समिती आणि गावकऱ्यांमार्फत गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्याबरोबरच ट्रेकिंगला जाणाऱ्या पर्यटकांना स्थानिक गाइडला घेऊन जाणेही बंधकारक करण्यात येणार आहे. ताम्हिणीतील बहुतांश धबधबे वनक्षेत्राला लागून असल्याने पर्यटक सगळा कचरा वनक्षेत्रात फेकतात. अशा उपद्रवी पर्यटकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांनी इतर दिवशी पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा. धुक्यामुळे, गवत वाढल्याने जंगलातील वाटा पुसल्या जातात. दरीलगतच्या वाटा निसरड्या होतात. धबधबे, त्याच्या डोहाची खोली आपल्याला पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पर्यटन जेवढे आनंददायी, तेवढेच अधिक जबाबदारीने करणे गरजेचे असते. अतिधाडसाला तिथे थारा नाही. पर्यटकांनी धाडस करणे टाळावे. अनवट वाटांवर फिरताना स्थानिक गाइडला बरोबर घ्यावे. कारवाई टाळण्यासाठी वन विभागाच्या नियमांचे पालन करावे.

– तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक (वन्यजीव), पुणे वन विभाग

जुलैपासून पर्यटकांची वाढत जाणारी गर्दी, लोहगडावर होणारी कोंडी लक्षात घेऊन गेल्या वर्षी आम्ही तीन वाजल्यानंतर पर्यटकांना गडावर प्रवेश बंद केला होता. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही करावा लागला. या वर्षीही आम्ही पावसाळी पर्यटन नियोजनासाठी पोलिसांसह, स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. या संदर्भातील प्रस्तावही तयार केला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून यंदाही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास दुपारी तीननंतर गडावरील प्रवेश बंद करण्यात येईल. सांयकाळी सहापूर्वी पर्यटकांनी गड रिकामा करणे बंधनकारक असेल.

– गजानन मंडावरे, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक पुरातत्त्व अधिकारी, पुणे विभाग