Pune News: सातबाऱ्यावर आईचंही नाव दिसणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय; कधी होणार अंमलबजावणी

प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे एक मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे; तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे.राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात आता संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.
Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांवर कारवाई अटळ? लोकसभेच्या निकालाआधीच शिंदे ‘निक्काल’ लावणार!

‘एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणीवेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करता येईल; परंतु त्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना (कॉलम) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत संगणकप्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्या प्रक्रियेला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल. त्या संदर्भातील पुरावे दाखल केल्यानंतर तलाठ्यामार्फत शहानिशा करून नोंद होणार आहे,’ असे ई-फेरफार प्रकल्पाच्या संचालिका सरिता नरके यांनी सांगितले.

एक मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावे खरेदी केलेल्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करण्यास येत्या काही वर्षांत अडचण येणार नाही. दरम्यान, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. स्त्रिला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची मुभा असेल, असेही नरके यांनी स्पष्ट केले.

एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करण्यात येईल; तसेच एक मे पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल. त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत नोंद होणार नाही.

– सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक, ई-फेरफार प्रकल्प