Pune: पुण्यात धक्कादायक घटना! शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

पुणे(आंबेगाव) प्रशांत श्रीमंदिलकर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेत तळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व मुले शेतमजूर कुटुंबातली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.श्रद्धा काळू नवले (वय: १३ इयत्ता सातवी) सायली काळू नवले (वय: ११ इयत्ता पाचवी ) दीपक दत्ता मधे (वय: ०७ राहणार- कान्हेवाडी राजगुरुनगर) राधिका नितीन केदारी (वय: १४ राहणार कानेवाडी राजगुरुनगर) अशी नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रद्धा व सायलीही दोन्ही मुले गोरक्षनाथ बबन कवठे यांनी दत्तक घेतली आहेत. कवठे हे निरगुडसर परिसरात शेतमजुरीचे काम करतात. ही दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शिक्षण घेत होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते चौघे बुडाले. याबाबत जवळ शेतात काम करत असलेल्या नागरिकांना यांबाबत माहिती मिळाली. ते घटनास्थळी पोहचेपर्यंत ती चारही जण पाण्यात बुडाले होते.

स्थानिक नागरिकांनी त्या मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यात शेत तळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या घटनेने शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवरेत पुन्हा दोघे बुडाले


नगर :अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदीत सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा दोघांचा बुडून मृत्यू झाला. संगमनेर शहराजवळील घाटाजवळ ही घटना घडली. आदित्य रामनाथ मोरे (वय १७ रा. घुलेवाडी) व श्रीपाद सुरेश काळे (वय १७ रा. कोळवाडे, संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. आधीच्या दुर्घटनेतील मृतदेह शोधण्यासाठी निळवंडे धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. मात्र, वाळू उपशामुळे झालेल्या खड्यांत डोह साचले आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे दोघे युवक संगमनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विहिरीजवळून नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचे मृतदेह पाण्यावर आले. वाळू उपसा आणि अवैध बंधाऱ्यांमुळे प्रवरा नदी धोकादायक बनत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.