आता रात्री-अपरात्री वेशांतर करुन, काळोखात लपून… संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Sanjay Raut Saamana Editorial : “मुंबईत मराठी बोलण्यावर व मराठी जगण्यावर दहशतीची गिधाडे फडफडत आहेत व ही गिधाडे स्वतःला भाजप समर्थक म्हणवून घेत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय?” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला. “हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे”, असा सल्लाही संजय राऊतांनी केला.

सरकार स्थापनेसाठी इतका कालावधी का लागला?

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करण्यात आले. त्यासोबतच संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. “भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे दोन मित्रपक्ष मिळून सवादोनशेचे पाशवी बहुमत असतानाही बारा दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला? या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता. त्या हट्टाला न जुमानता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल बारा दिवसांनी महाराष्ट्रात नवे सरकार विराजमान झाले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले, हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे, पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे. आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी ‘धो-धो’ मते पडून आपण विजयी झालो कसे? हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली”, असे संजय राऊत म्हणाले.

…तर कायदा-सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल

“महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. ‘शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला’, अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळे वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी गावागावांत सुरू आहे. मारकडवाडीसारख्या ठिकाणी लोकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला, पण 144 कलम लावून पोलिसी दडपशाहीने तेथे लोकशाहीचा गळा घोटला. मारकडवाडीचे हे लोण राज्यातील गावागावांत पसरत गेले तर कायदा-सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल. अशा वेळी नवे मुख्यमंत्री दडपशाही करणार की संयमाने वागणार?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थितीत केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)