North West Mumbai Lok Sabha Election Result 2024 : उत्तर पश्चिम मुंबईवर कुणाचा ताबा?

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अमोल गजानन कीर्तिकर विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर असा सामना आहे. वायव्य मुंबईतील ही लढत दोन शिवसैनिकांमधील असल्यामुळे त्याकडे अनेकांचं लक्ष आहे उत्तर पश्चिमचे खासदारपद भूषवणाऱ्या गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला, मात्र त्यांचे सुपुत्र अमोल हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते. गजानन कीर्तिकरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, त्यामुळे विरोधी पक्षात असलेला त्यांचा मुलगा ही सीट जिंकणार, की कीर्तिकरांच्या पक्षाकडेच ती राहणार, याची उत्सुकता होती. मतदानानंतर कीर्तिकरांनी लेकाविषयी व्यक्त केलेली तळमळ, भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप यामुळे ही लढत रंगतदार झाली होती.

गेल्या लोकसभेला ज्यांच्यासाठी प्रचार केला ते आता सोबत आहेत. मात्र, त्यांच्याच मुलाविरुद्ध लढावे लागत आहे, अशी वेळ वायकर यांच्यावर आली होती. तर दुसरीकडे, वडील गजानन कीर्तिकर यांनी बांधलेल्या मतदारसंघात वायकर यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्याविरोधात लढा द्यावा लागत असून वडीलही विरोधी गटात असल्याची अवस्था अमोल कीर्तिकर यांची झाली होती. अशा विचित्र समीकरणात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगली.

उमेदवार पक्ष विजय/पराभव
अमोल कीर्तिकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रवींद्र वायकर शिवसेना
राजेश मल्लाह बसप
परमेश्वर रानशूर वंचित बहुजन आघाडी

२०१४ आणि २०१९ असे सलग दोन वेळा गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेकडून लढत येथे विजय मिळवला होता. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये त्यांचे मताधिक्य वाढले.

अमोल कीर्तिकर यांच्यासमोर ३५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या, चारवेळा नगरसेवक व तीनवेळा आमदार असलेल्या रवींद्र वायकर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराचे आव्हान होते. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना रुजविण्यासाठी वायकर यांनी जिवाने रान केले आहे. त्या तुलनेत अमोल कीर्तिकर यांना राजकारणाचा थेट अनुभव नव्हता. परंतु यापूर्वी वडिलांसाठी केलेला प्रचार, त्याचे नियोजन व यामुळे संपूर्ण मतदारसंघाची त्यांना असलेली जाण किंचित अधिक होती. तसेच लोकसभेचे तिकीट मिळणार, हे अमोल कीर्तिकर यांना वर्षभर आधीपासून माहित होते. त्यामुळे प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली होती. जवळपास प्रत्येक वस्ती, भाग त्यांनी पिंजून काढला आहे. वडील शिवसेनेत असले तरीही, त्यांच्या खासदारकीच्या काळात झालेल्या कामांचा प्रचार करण्याची संधी अमोल कीर्तिकर यांना मिळत होती.

निवडणूक जिंकण्याचा भरभक्कम अनुभव रवींद्र वायकर यांच्या पाठीशी आहे. मोठा जनसंपर्क व केलेल्या कामाची छाप, हा प्रभाव जोगेश्वरी व दिंडोशीपुरता मर्यादित आहे. या स्थितीत महायुतीअंतर्गत तिकीट ३० एप्रिलला ऐनवेळी घोषित झाल्यानंतर जेमतेम १७ दिवसांत अन्य चार विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान वायकरांपुढे होते. मात्र जोगेश्वरीचा मागील २० वर्षांत केलेला कायापालट, हीच उमेदवार या नात्याने खरी ओळख असून असेच काम दिल्लीत पोहोचून करून दाखवण्याचा प्रबळ आत्मविश्वास ते प्रचारात दाखवत होते.

सहकारी पक्षांच्या मदतीचा विचार केल्यास येथे अमोल कीर्तिकर यांना आघाडीची साथ अधिक होती. त्यांच्या प्रचारफेरीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार, आप, माकप असे सर्वच घटक पक्ष आवर्जून उपस्थित असत. त्या तुलनेत रवींद्र वायकर यांच्या प्रचारफेरीत प्रमुख घटक पक्ष भाजपसह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्ष नाममात्र उपस्थित होते. ‘भाजप माझ्यासाठी जोमाने काम करतेय’, असा दावा वायकर करीत असले तरीही प्रचारफेऱ्यांत ते चित्र दिसून येत नसल्याचे वास्तव होते.

देशात असलेले सत्तापक्षाच्या दिशेचे वारे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना वायकरांना जाणूनबुजून गोवण्याचा झालेला प्रयत्न व त्यामुळेच नाईलाजास्तव बदललेला गट आणि काम तडीस नेण्याचा त्यांचा इतिहास, या बाजूंवर वायकर पुढे जात राहिले. त्याचवेळी दुसरीकडे आधीपासून केलेला प्रचार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेली सहानुभूती आणि वडिलांनी मतदारसंघात केलेली कामे, यावर अमोल कीर्तिकर पुढे जात होते. त्यातूनच ही लढत चुरशीची झाली होती.

दोन विधानसभा मतदारसंघ निर्णायक

या लोकसभा मतदारसंघातील दिंडोशी व वर्सोवा, हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरले. दिंडोशी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आमदार आहेत. मात्र ते अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात फार सहभागी दिसून येत नव्हते. वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार असल्या तरीही त्यांच्या मताधिक्क्यात २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये मोठी घट झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राजूल पटेल यांच्या बंडखोरीमुळे २०१९ च्या विधानसभेत युती असतानाही भाजपच्या आमदार भारती लवेकर यांच्या मतांत घट झाली होती. आता राजूल पटेल या अमोल कीर्तिकरांसाठी जोमाने प्रचार करीत असतानाच येथील काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा हे कीर्तिकर यांच्यासोबत आहेत. त्यामुळेच हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरत आहेत.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News