NEET Exam: ‘नीट’ची जबाबदारी राज्यांकडे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वर्तवली शक्यता

मुंबई : ‘वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचारही पुढे आला असून, केंद्र सरकार त्यासंदर्भात तपासणी करून निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विधानसभेत दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेतील घोटाळ्याचे पडसाद शनिवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.नीट परीक्षा प्रक्रियेतील घोटाळ्याप्रकरणी राज्यात काही जणांना अटक करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नी विधानसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यानंतर वडेट्टीवार आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कडक कायदा करण्याची मागणी केली. ‘नीट परीक्षेत घोटाळे सुरू आहेत. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा गैरव्यवहार होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षणमंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘नीटच्या पेपरफुटीप्रकरणी लातूरमधून काही जणांना अटक करण्यात आली आहे. पेपर फुटणे ही गंभीर बाब असून, अशा शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपरफुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का,’ असा प्रश्न पटोले यांनी या वेळी उपस्थित केला.

‘विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही’

‘वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. त्याद्वारे दोषींवर कठोर कारवाईसह मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचारही पुढे आला. केंद्र सरकार त्यासंदर्भात तपासणी करून निर्णय घेणार आहे. दिवसरात्र अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार बांधील असून, विरोधी पक्षांनी सुचविलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.