Nana Patole: वायकरांवरुन वाक्‌युद्ध; आणखी एका भ्रष्ट नेत्याची ‘धुलाई’, नाना पटोलेंची खोचक टीका

मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप असलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या हॉटेल भूखंड घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात ‘तपास बंद’ अहवाल सादर केल्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. ‘वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशिनमधून भ्रष्ट नेत्याला स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दिली.‘मोदी सरकार हे ‘ईडी’ व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांमार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो; परंतु अनेक उदाहरणे आहेत, वायकर हे त्यातीलच एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत,’ असा आरोप पटोले यांनी केला.

‘या प्रकरणावर बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांनाी क्लीन चिट देऊन फाइल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही,’ असे पटोले म्हणाले.

‘पुण्यात वाहतूक शाखेतील एका पोलिस महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. तुरुंगातील आरोपींना व्हीआयपी वागणूक मिळते, ससून रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली आरोपींना पंचतारांकित सुविधा दिली जाते,’ असा आरोपही त्यांनी केला.
Ravindra Waikar : वायकरांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी
‘शिंदे, फडणवीस, पवार ‘हिट विकेट’ होणार’

‘दोन वर्षांपूर्वी आम्हीही विकेट काढली होती,’ असे वक्तव्य भारतीय क्रिकेटपटूंच्या सत्कारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केले. यावर पटोले म्हणाले, ‘७० दिवसांनंतर खरी मॅच सुरू होणार आहे, दोन वर्षांपूर्वी जे झाले तो लपवाछपवीचा, खोक्यांचा खेळ होता. आता खरा सामना लोकांच्या दरबारात होणार आहे. नागरिकांची काळजी नसलेले मुख्यमंत्री सध्या सत्तेत आहेत, सरकारच अदानीसाठी काम करत असून, आता लोकच खोके सरकारचा ‘कॅच’ घेणार आहेत. या मॅचनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ‘हिट विकेट’ होणार आहेत,’ असा टोलाही पटोले यांनी लगावला.