MVA चा चेहरा कोण? जागा वाटपाचा फॉर्मुला काय? ‘त्या’ आमदारांवर वक्तव्य करत वेणुगोपाल यांनी सगळंच सांगितलं

मुंबई: आमच्याकडे पूर्ण माहिती आहे. आम्ही त्या आमदारांवर कारवाई केली आहे. आम्ही जी कारवाई केली ती भविष्यात कळेल. कॉंग्रेसमध्ये शिस्त महत्वाची आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस खासदार के सी वेणूगोपाल यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कॉंग्रेसने आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वेणूगोपाल यांनी हे वक्तव्य केले आहे.
Wagh Nakh: वाघनखांचा थाटात कार्यक्रम पण मुनगंटीवारांच्या खात्याचा बेसिकमध्ये लोचा, भारताचा नकाशा चुकीचा दाखवला!
मुंबईतील बैठकीत सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुंबईत पोहोचले होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासोबतच जागावाटपाचा फॉर्म्युला आणि एमव्हीएचा चेहरा याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील वानखेडे स्टेडियम परिसरात पार पडली. दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांचा रोख हा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई होते याकडेच होता.मात्र कुठल्याही नेत्याने नेमकी काय कारवाई केली याबद्दल तपशील देण्यास असमर्थता व्यक्त केली. दस्तरखुद्द के सी वेणुगोपाल यांनी सुद्धा यासंदर्भात बोलणं टाळलं आहे. त्यांनी कारवाई केली हे सांगून टाकलं. मात्र कारवाईचं स्वरूप आणि नावं न सांगताच पत्रकार परिषद आटोपती घेतली. कारवाईचं स्वरूप आणि नावं सांगितली तर भविष्यात पक्षाला अडचण होईल, असा एकंदरीत हेतू त्यात दिसत होता. तर दुसरीकडे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई करावी या संदर्भात पण काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले आहे. यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर खुली कारवाई करू नये असा पण मतप्रवाह पाहायला मिळाला.

महाविकास आघाडीचा चेहरा आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत काँग्रेसचे नेते म्हणाले, आम्ही जागावाटपाबाबत बोलत आहोत. मग आम्ही एकत्र चर्चा करू. राज्यातील काँग्रेस नेत्यांना एकजूट राहून एका आवाजात बोलण्यास सांगण्यात आले आहे. पक्ष सर्व एमव्हीए सहयोगींच्या संपर्कात आहे. आम्ही बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करू. आज आम्ही आमच्या पक्षाला सांगितले आहे. राज्य निवडणुकीची तयारी आणि बळकट करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली.