MVA Against Narayan Rane: वायकरांनंतर आता राणेंचे टेन्शन वाढणार, महाविकास आघाडीची राणेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरुन सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईत आता आणखी एक भर पडणार आहे. रविंद्र वायकरांच्या बाजूने दिलेल्या निवडणूक निकालावर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीने आता थेट नारायण राणे यांच्या निकालाविरोधात दाद मागितली असून भ्रष्ट मार्गांचा वापर करुन हा विजय मिळविला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. तर राणे यांची निवड रद्द करावी याशिवाय त्यांच्यावर पाच वर्षे मतदानाच्या प्रक्रियेवर बंदी घालण्यासंदर्भातील नोटीस पाठवण्यात आली. राऊत यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक, अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत निवडणूर आयोगाला नोटीस पाठवली असल्याचे बुधवारी जाहीर केले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर आरोप करणारी ही नोटीस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या नोटीसमध्ये विनायक राऊत म्हणतात की, या मतदारसंघासाठी निवडणुक प्रचार कालावधी ५ मे ला संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते ६ मे ला सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतानाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे यांनाच मत द्या, असे सांगत मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाली, असे नोटिस मध्ये नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सुद्धा जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, ‘जर राणे यांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाला नाही तर आमच्याचकडे निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड नाही तर निधी सुद्धा नाही, याचा देखील उल्लेख नोटिसमध्ये करण्यात आला आहे.
मी स्वत: निवडणूक लढविणार नाही, विधानसभेसाठी आमचा १२७ जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण : मनोज जरांगे पाटील
केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसांत या नोटिसवर उत्तर द्यावे, अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात येईल, असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले. तर ‘अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करु देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणाकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आले आहेत, हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी, अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी अधोरेखित केले.