Mumbai Water Crisis: पाणीटंचाईचे संकट आणखी गडद, जाणून घ्या राज्यातील धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा?

प्रतिनिधी, मुंबई : राज्यात तापमानाचा पारा वाढत असल्याने पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. जलसंपदा विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या २३.६३ टक्क्यांवर आला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे परिस्थिती गंभीर असल्याचे उघड झाले. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील धरणांमधील पाणीसाठा अनुक्रमे ९.५५ टक्के आणि १७.५९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये ३३.५९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी आहे.जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे सर्वांत कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. तेथील एकूण ९२० धरणांमध्ये केवळ ९.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणांमध्ये केवळ ६९३.३७ द.ल.घ.मी पाणीसाठा उपयुक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यापाठोपाठ पुण्यातील एकूण ७२० धरणांमध्ये १७.५९ टक्के पाणीसाठा आहे.

Pune Traffic : जड वाहतूकबंदीकडे पोलिसांचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीत भर, पुण्यात अशी येतात जड वाहने

नाशिक येथील ५३७ धरणांमध्ये २५.७४ टक्के पाणीसाठा, तर कोकणातील १७३ धरणांमध्ये ३७.११ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर येथील ३८३ धरणांमध्ये ३८.८३ टक्के पाणीसाठा असून, अमरावतीमधील २६१ धरणांमध्ये ३९.९४ टक्के साठा असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

राज्यभरात ३,६९२ पाणीटँकर

राज्यात एकूण २५ जिल्ह्यांत दोन हजार ७९३ गावे आणि सात हजार ६७१ वाड्यांमध्ये तीन हजार ६९२ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. त्यात ९७ शासकीय आणि तीन हजार ५९५ खासगी टँकर्सचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक एक हजार ८४९ टँकर हे छत्रपती संभाजीनगर विभागात नोंदविण्यात आले आहेत.