Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

मुंबई : मुंबईमध्ये सोमवार ते बुधवार चढे तापमान सहन केल्यानंतर गुरुवारी कमाल तापमानाचा पारा किंचित उतरला होता. परंतु शुक्रवारी पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतल्याने सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथेही ३५.२ अंश सेल्सिअस तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत येणारा प्रचंड उकाड्याचा आणि उष्ण हवेचा अनुभव सोमवारी कायम असेल असाही अंदाज आहे.

गुरुवारी कुलाबा येथे ३४ अंश सेल्सिअस तापमान होते. शुक्रवारी यात १.२ अंशांची वाढ झाली. सांताक्रूझ येथे ०.१ अंशाने तापमान वाढले. मुंबईत पश्चिम उपनगरांमध्ये गुरुवारी रात्री उशिरा तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. शुक्रवारीही हलक्या सरींची शक्यता मुंबईमध्ये वर्तवण्यात आली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाची हजेरी नव्हती. दिवसभर वातावरणात उष्मा कोंडून राहिला होता. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही. दिवसभरात वातावरणामध्ये आर्द्रताही ६० टक्के किंवा अधिक होती. कुलाबा येथे २७.८ तर सांताक्रूझ येथे २८.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मुंबईच्या तापमानामध्ये सध्या होणारा चढउतार येत्या काही दिवसांमध्ये कायम असू शकेल. तापमानाचा पारा फारसा चढणार नसला तरी सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदानाच्या दिवशीही मुंबईकरांना ३३ ते ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाशी सामना करावा लागेल. येत्या तीन दिवसांमध्ये मुंबईमध्ये कोरडे वातावरण असू शकेल. त्यामुळे सूर्याची किरणे थेट पोहोचून अधिक चटके जाणवू शकतील. पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्येही सोमवारी कोरड्या वातावरणाचा अंदाज आहे. महामुंबई परिसरासोबतच धुळे, दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघांमध्येही सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघातही वातावरण कोरडे असू शकेल असा अंदाज आहे.

१ मार्चपासून पाऊस किती?

मुंबईमध्ये उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शहरात ३.७ मिलीमीटर म्हणजे या काळातील सरासरीइतका पाऊस पडला आहे. तर मुंबई उपनगरांमध्ये २१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मेच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत मुंबई उपनगरांमध्ये सरासरी २.६ मिलीमीटर पावसाची नोंद होते. ठाणे जिल्ह्यात २५.२ मिलीमीटर, नाशिकमध्ये १४.७ मिलीमीटर तर धुळ्यात ४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नाशिकमध्ये सरासरीहून अधिक तर धुळे जिल्ह्यात सरासरीहून कमी पाऊस १ मार्च ते १७ मे या काळात नोंदवला गेला आहे.