Mumbai Rains : मुंबईसह ठाणे, विरार नवी मुंबईत पावसाचा जोर; लोकल वाहतूक मंदावली, दिवसभर मुसळधार

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवार रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. दादर, लालबाग-परळसह वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर वसई, विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागातही दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

शनिवार असल्यामुळे बहुतांश नागरिकांना सुट्टी असून पावसाळी वातावरणात त्यांची साखरझोप पूर्ण होत आहे. मात्र सकाळी लवकरच कामावर निघणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगलीच त्रेधातिरपीट उडत आहे. कारण मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूकही काहीशी मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक दहा मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्याही पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत आहेत.

सकाळी साडेसात वाजताची लोकलची स्थिती

मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने
पश्चिम रेल्वेवरील लोकल ५ ते १० मिनिटं विलंबाने
हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने

आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून मुंबईकरांना जपून राहण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळीच बाहेर जाण्याचं नियोजन असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Aanvi Kamdar Travel Influencer: आनवी कामदार रील शूट करताना पडली नाही, मैत्रिणीचा दावा; तिच्या आईला कुणी जाऊन सांगतंय…

पर्यटक सुखावले

दरम्यान, शनिवार-रविवार वीकेंडला जोडून पावसाळी पर्यटनाचे बेत आखणाऱ्या पर्यटकांची आज चंगळ झाली आहे. कारण त्यांना अपेक्षित असा दमदार पाऊस सुरु झाला आहे. गेले काही दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे हवेत काहीसा उकाडा जाणवत होता. परंतु रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण चांगलेच थंडावले आहे.

सध्या रस्ते वाहतूक सुरळीत असल्यामुळे वीकेंड रोड ट्रीप आणि लाँग ड्राईव्हला जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांचे प्लॅन्स जोर धरु लागले आहेत. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचून त्यांच्या प्लॅन्सवरही पाणी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय वाहतूक कोंडी किंवा रस्ते बंद झाल्यास प्लॅनिंग बारगळू शकतं.

काही पर्यटन स्थळांवर बंदी

गेल्या महिन्यात पुण्याजवळील लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात झालेली दुर्घटना असो किंवा रायगड येथील कुंभे धबधब्याजवळ पाय घसरुन ३५० फूट खोल दरीत पडून ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर तरुणीचा झालेला मृत्यू असो, मुंबईजवळची काही धोकादायक पर्यटन स्थळं, शिवाय रायगड रत्नागिरीतील काही निसरडे धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.