Mumbai Rains: मुंबईत मुसळधार! गरज असेल तरच घराबाहेर पडा, पोलिसांचं नागरिकांना आवाहन

मुंबई : मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारीपासून मुंबईत सतत पावसाची संततधार सुरू आहे. रविवारीही मुंबईसह उपनगरातही जोरदार बॅटिंग सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना किनारी भागात जाण्याचं टाळण्याचं आवाहन केलं आहे. अत्यंत आवश्यक असेल, तरच लोकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत १०० डायल करा आणि सावधगिरी बाळगा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सेंट्रल रेल्वेवरील लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहेत. अंधेरी सब-वे बंद करण्यात आला आहे, त्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळवल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मालाड आणि मिलन सब-वेमध्येही पाणी भरलं आहे. तर दुसरीकडे कुर्ल्यातील एलबीएस रोडवर पाणी भरल्याने पूर्ण उपनगराकडे जाणाऱ्या वाहनांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आहे.
Nandurbar Water Crises : भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट, झऱ्यातील गढूळ पाण्याने भागवावी लागते तहान; प्रशासनाचं दुर्लक्ष

मुंबईतील समुद्रात उंच लाटा

मुंबईत शनिवारी समुद्रात जवळपास ११.३० वाजता ३.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. आज रविवारी दुपारी १२.१० वाजता समुद्रात ४.४४ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचं सांगण्यात आलं होतं. सततच्या पावसामुळे मुंबईकरांना विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

School Wall Collapsed : लंच ब्रेक सुरू असताना अचानक वर्गाची भिंत कोसळली, थरकाप उडवणारं CCTV फुटेज समोर

२० लोक अडकलेले

मुसळधार पावसामुळे बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील एका नाल्याला पाण्याचा वेग वाढला. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलेले २० लोक या पाण्यात अडकले होते. काही लोक अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर काही कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचले होते. नाल्याच्या एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक ह्यूमन चेन बनवून वेगाने वाहणारा नाला पार करता आला.

रेल्वे सेवेवर परिणाम

मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मानखुर्द, कुर्ला आणि पनवेल स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरू झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत.