Mumbai-Pune Expressway: खंडाळा घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात; कारमधील दोघांचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी, लोणावळा : ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे’वर खंडाळा घाटात खोपोलीच्या हद्दीतील फूडमॉलजवळ कंटेनर आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.

दोघांचा दुर्दैवी मृत्यू
दिलीप जालिंदर जगताप (६०, मुलुंड, मुंबई), कौस्तुभ अनिल गोटे (३२, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. कारचालक अमोल खरमाळे (४७, नेरूळ, नवी मुंबई), संजय नवले (३४, पिंपरी-चिंचवड) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

तीन वाहनांचा विचित्र अपघात
खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून धडकला. मागून भरधाव वेगात येणारी ‘वॅगनर कार’ चालकाचे नियंत्रण सुटल्याने याच कंटेनरला धडकली. या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
स्कूल बस ठरली काळ! कॉलेजात जाताना विद्यार्थ्यासोबत अनर्थ, रस्त्यातच गेला जीव; थरारक घटना
अपघातातील जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनने बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.