Mumbai News : चिंता वाढवणारी बातमी! मुंबईतील रक्तपेढ्या कोरड्या, जाणून घ्या रक्त संकलनाची आकडेवारी

प्रतिनिधी, मुंबई : एप्रिल व मे महिन्यातील रजा, मुंबईबाहेर गेलेले रक्तदाते, रक्तसंकलनामधील नियोजनाचा अभाव आणि निवडणुकांमुळे रद्द झालेली संकलन शिबिरे यांचा विपरित परिणाम मुंबईत दिसू लागला आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.गरजू रुग्णांसाठीच्या रक्तासाठी कुटुंबीय तसेच नातेवाईक ठिकठिकाणी विचारणा करीत आहेत. निगेटिव्ह गटाचे रक्त मिळवताना रुग्णांच्या कुटुंबीयांची अधिक दमछाक होत असल्याचा अनुभव नातेवाईकांनी सांगितला. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या माहितीनुसार ‘ई रक्तकोष’वर रविवारी दुपारी पावणेबारापर्यंत लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे अवघे पाच युनिट रक्त उपलब्ध होते.

Pune News : ईव्ही बदलून द्यायची मागणी; कंपनी संचालकांचा युक्तिवाद,आयोगाने ग्राहकाची तक्रार फेटाळली

पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्थिती थोडी समाधानकारक होती. तर बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीमध्ये बी पॉझिटिव्हच्या नऊ, ए पॉझिटिव्हच्या बारा, ओ पॉझिटिव्हच्या पाच, एबी पॉझिटिव्हच्या तीन पिशव्या उपलब्ध होत्या. वाडिया रुग्णालयामध्ये शनिवारी सकाळी अकरापर्यंत ओ पॉझिटिव्हच्या पंधरा, ए पॉझिटिव्हच्या बारा, बी पॉझिटिव्हच्या २३, ओ निगेटिव्हच्या दोन तर एबी पॉझिटिव्हचे पाच युनिट रक्त उपलब्ध होते.

मुंबईतील सर्वांत मोठी रक्तपेढी असलेल्या जे. जे. महानगर रक्तपेढीमध्ये ओ पॉझिटिव्हचे पाच, एबी पॉझिटिव्हचे चार, ए पॉझिटिव्हचे दहा, तर एबी निगेटिव्हचे एक युनिट रक्त उपलब्ध होते. मुलांसाठीच्या एनएच एसआरसीसी रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये पी निगेटिव्ह रक्तगटाचे एक, ए निगेटिव्ह रक्तगटाचे एक, ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे अकरा, तर बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे पाच युनिट उपलब्ध होते.

‘थॅलेसेमिया तसेच रक्ताशी संबधित दुर्धर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सध्या धावपळ करावी लागत असल्याचा अनुभव गरजूंना मदत करणाऱ्या ऋषी साबळे यांनी सांगितला. लहान मुलांना कमी प्रमाणात रक्ताची गरज लागते. त्यासाठी ‘अलिकॉट’ ही छोट्या पिशव्या तयार करणारी यंत्रे सज्ज ठेवावीत, असे निर्देश राज्य मानवाधिकार आयोगाने रक्तपेढ्यांना दिले आहेत. अशा बालरुग्णांसाठीही रक्ताची विचारणा होत आहे. सार्वजनिक रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांप्रमाणेच पालिका रुग्णालयांसाठीही या यंत्राची उपलब्धता ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषदेशी संपर्क होऊ शकला नाही.

रक्तपेढ्या चोवीस तास सुरू हव्यात

कांदिवली शताब्दी तसेच वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील रक्तपेढ्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येतात. तुटवड्याच्या या काळात रक्तपेढ्या चोवीस तास सुरू ठेवणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.