Mumbai News: घुसमट होत असेल तर छगन भुजबळ सरकारमधून बाहेर पडतील, जितेंद्र आव्हाडांचे सूचक वक्तव्य

मुंबई: छगन भुजबळ यांच्याविषयी माझ्या मनात कायम आदर आहे. त्यांना जर घुसमटल्यासारखे वाटत असेल तर ते सरकारमध्ये थांबणार नाहीत, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रश्नांसाठी संभ्रमात ठेवले आहे. त्यांना अस्वस्थ करुन सोडले आहे. निवडणुकीत त्यांचा कसा वापर करता येतो, हे सरकार पाहते, अशी टीकाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय भाजप मंत्रिमंडळात असणं केवळ अशक्य : हसन मुश्रीफ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ सध्या नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातही सोमवारी ओबीसी कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली समता परिषदेची बैठकही त्यांनी बोलावली होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली होती. यावर बोलताना आव्हाड यांनी भुजबळ यांना घुसमटल्यासारखे वाटत असेल तर ते सरकारमध्ये थांबणार नाहीत, असे आव्हाड म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या महायुतीच्या समावेशामुळे अपयश आल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असलेल्या ऑर्गनायझर या मासिकाकडून करण्यात आली. याविषयी बोलताना आव्हाड म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये झालेला पराभव कुणामुळे झाला, तिथे कोणते अजित पवार होते, एखाद्या नेत्याला घेरुन त्याला त्रास देणे हे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी पवार यांची पाठराखण केली.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबतील वादाबाबत आव्हाड म्हणाले की, अमोल कीर्तीकर पराभूत झालेले नाहीत त्यांना पराभूत केले गेले आहे. निवडणूक अधिकारीच्याच हातून सिध्द झाले आहे की, ईव्हीएम मॅनेज करता येतात. देशातील कित्येक मतदारसंघात ईव्हीएम आणि १७सी फॉर्ममधील मतांची आकडेवारी वेगळी आहे. याचा अर्थ काहीतरी झालेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने चंदीगडप्रमाणे स्युओ मोटो हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.