Mumbai Metro: भूमिगत मेट्रोला विलंब? गाड्यांच्या चाचण्या अद्याप सुरुच, २ डेडलाइन आधीच हुकल्या

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या मेट्रो-३ या भूमिगत मेट्रो मार्गिकेला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या गाड्यांच्या इलेक्ट्रिकल चाचण्या बाकी असून त्यानंतर सुरक्षेसंबंधी प्रमाणीकरण होणार आहे. त्यामुळेच आधीच दोन डेडलाइन हुकलेली ही मार्गिका सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत.मेट्रो-३ ही आरे ते कफपरेड मार्गे बीकेसी अशी ३३ किमी लांबीची व २७ स्थानकांची राज्यातील सर्वांत मोठी भूमिगत मेट्रो मार्गिका असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) तिची उभारणी होत आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी (प्राप्तीकर कार्यालय) असा असेल. सुरुवातीला २३ हजार कोटी रुपये असलेला या प्रकल्पाचा खर्च पुढील काळात ३३ हजार कोटी रुपयांवर गेला. या मार्गिकेवरील गाड्यांच्या दुरुस्तीसाठी आरे येथील काही झाडे तोडून त्या ठिकाणी कारशेड (दुरुस्ती डेपो) उभे करायचे होते. मात्र वृक्षतोडीविरोधात आंदोलन व न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा प्रकल्प मूळ डेडलाइनपेक्षा दोन वर्षे रेंगाळला. मात्र दोन वर्षांनंतरही आता दोन ‘डेडलाइन’ हुकल्या आहेत.

आंदोलनानंतर झालेल्या विलंबानंतरही मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३मध्ये सुरू होईल, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर ही मार्गिका एप्रिलमध्ये सुरू होईल, असे कंपनीकडून एका कार्यक्रमात घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावेळी स्थानक उभारणीसह गाडीची चाचणी बाकी होती. या चाचण्यांनंतर जूनअखेरीस ही मार्गिका सुरू होईल, असे सांगितले जाते. मात्र अद्याप मार्गिकेतील काही चाचण्यांसह सुरक्षेसंबंधीचे प्रमाणीकरण बाकी आहे.

Mumbai Metro: मेट्रो २अ, मेट्रो ७मध्ये तीन कोटींचा घोटाळा; मनुष्यबळ कमी पुरवूनही मोबदला घेतला पूर्ण
एमएमआरसीतील सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी प्रत्येकी आठ डब्यांच्या अत्याधुनिक नऊ गाड्या ताफ्यात आल्या असून त्यांची वेगांची चाचणी पूर्ण झाली आहे. रिसर्च अँड डिझाइन स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) मानकांनिहाय ही चाचणी असते. मात्र विद्युत प्रणाली व डब्यांची सिग्नल यंत्रणेसह एकात्मिकरणाची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर प्रमाणीकरण होणार आहे.

महत्त्वपूर्ण चाचण्या

मेट्रो मार्गिका सुरू करण्याआधी त्यातील ‘आरडीएसओ’ चाचण्या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. त्यात डबे वेगाने धावतात. ती चाचणी पूर्ण झाली असली, तरीही सर्व चाचण्यांअंती कमिशनर ऑफ मेट्रो सेफ्टी (सीएमआरएस) यांचे सुरक्षा निरीक्षण होते व त्यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मार्गिका सुरू करता येते. त्यास विलंबाची शक्यता आहे.