Mumbai Local: मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय, आता रेल्वे स्थानकात पाणी साचणार नाही, कारण…

प्रतिनिधी, मुंबई : यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसात हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वेप्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे रुळांची उंची ४ इंचांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याचे कामही सुरू केले आहे.शहरात ८ जुलै रोजी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच्या ६ तासांमध्ये ३०० मिमीची नोंद झाली. यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने चुनाभट्टी स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील फलाटालगत असलेल्या सीएसएमटीकडे आणि पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांची उंची २ ते ४ इंचांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. रुळांची उंची वाढवताना ओव्हरहेड वायरच्या रचनेतही बदल होणार आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या ४४० मीटर लांबीच्या आणि पनवेलकडे जाणाऱ्या ३५० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या १०० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या अत्याधुनिक मशिनच्या मदतीने उंची वाढवण्यात येत असून येत्या काही दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चुनाभट्टी स्थानक परिसरात वेगमर्यादेसह लोकल धावत्या राहणार आहेत, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Pooja Khedkar Case: पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट! चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना

रुळांची उंची वाढवल्यानंतर लोकल डब्याचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतर वाढते. यामुळे मोठ्या प्रमाणात उंची वाढवताना मर्यादा येतात. पायदान आणि फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंचीही वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चुनाभट्टी स्थानकात यापूर्वीही पाणी भरल्याच्या घटना घडल्या असल्याने या ठिकाणी उच्च क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र, मिठी नदीच्या पाण्यामुळे रस्तेही जलमय झाल्याने उपसा केलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ते बांधकाम वेगाने पूर्ण करणार

नाहुर-भांडुपमधील उषानगर नाल्यातील बांधकामांबाबत मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे यांच्यातील वरिष्ठ अभियंत्यांमध्ये बैठक पार पडली. बैठकीत पावसाळ्यात झालेल्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या खोळंब्याच्या कारणावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी महापालिकेकडून उषानगर नाल्यावर सुरू असलेले बांधकाम वेगाने पूर्ण करून पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी उपाय करण्यात येणार असल्याचे आश्वासन संबंधितांनी दिल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.