Maharashtra Water Level: राज्यातील पाणीपरिस्थिती चिंताजनक; धरणांमध्ये केवळ २३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबई : राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा आता अवघा २३ टक्केच राहिला आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी परिस्थिती चिंताजनक असून छत्रपती संभाजीनगर येथे तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी केवळ ९.१८ टक्के इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे धरणांमधील पाणीसाठ्याचा आलेख कमी होत असतानाच टँकरची संख्या मात्र वाढत आहे. राज्यभरात सोमवारपर्यंत एकूण ३ हजार २९ गावे आणि ७ हजार ७३८ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागातर्फे सोमवारी सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालातून वरील माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण २ हजार ९९४ धरणांमध्ये सोमवारपर्यंत केवळ २३.०१ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच २७ मेपर्यंत राज्यातील धरणांमध्ये ३२.३६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा ९.३५ टक्क्यांनी कमी असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात सध्या एकूण १५,७१३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून, त्यातील फक्त ९,३१६.८० दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा उपयुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वांत कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एकूण ९२० धरणांमध्ये सध्या केवळ ६६६.३१ दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा उपयुक्त असून ९.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. त्यापाठोपाठ पुणे येथील ७२० धरणांमध्ये केवळ १६.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. तर, नाशिक येथील ५३७ धरणांमध्ये २४.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
धरणे आटली, चिंता दाटली! नाशिक जिल्ह्यातील नऊ प्रकल्प कोरडेठाक, कोणत्या धरणात किती पाणी?
अमरावती येथे सर्वाधिक पाणीसाठा

अमरावती जिल्ह्यातील २६१ धरणांमध्ये सध्या सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावतीत एकूण ३९.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली असून, त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात ३८.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणातील १७३ धरणांमध्ये ३६.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टँकरची संख्या ३ हजार ७१३वर

राज्यात एकीकडे धरणांमधील पाणीसाठा कमी होत असतानाच टँकरद्वारे पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ३ हजार ७१३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात ३ हजार ६१३ खासगी आणि ९६ सरकारी टँकरचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक टँकरद्वारे (१,८६६) पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यभरातील एकूण ७ हजार ७३८ वाडे आणि ३ हजार २९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.