Maharashtra Water Crisis: राज्यात भीषण पाणीटंचाई; धरणांत २४ टक्केच पाणीसाठा, टॅंकरची संख्या हजारांत

मुंबई : शहरासह राज्यात उन्हाचे चटके आता अधिक तीव्र होऊ लागले आहेत. एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असतानाच येत्या काळात पाणीटंचाईचे भीषण संकट राज्यापुढे उभे ठाकले आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये बुधवारी केवळ २४.०३ टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यात छत्रपती संभाजीनगर येथे परिस्थिती खूपच बिकट असून, याठिकाणी धरणांमधील पाणीसाठा अवघ्या ९.७३ टक्क्यांवर आला आहे. राज्यातील सुमारे १० हजार गावे आणि वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.जलसंपदा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २२ मेपर्यंतच्या पाणीसाठ्यामध्ये एकूण दोन हजार ९९४ धरणांतील पाण्याचा समावेश आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये ३४.३६ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तो थेट २४.०३ टक्क्यांवर आला आहे. यातील सर्वांत कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे नोंदवण्यात आला आहे. येथील एकूण ९२० धरणांमध्ये केवळ ९.७३ टक्के पाणी शिल्लक आहे. या धरणांमध्ये केवळ ७०६.१९ द.ल.घ.मी पाणीसाठा उपयुक्त आहे. त्यापाठोपाठ पुण्यातील एकूण ७२० धरणांमध्ये १८.१८ टक्के, नाशिक येथील ५३७ धरणांमध्ये २६.३४ टक्के, तर कोकणातील १७३ धरणांमध्ये ३७.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर येथे ३८३ धरणांमध्ये ३८.८८ टक्के आणि अमरावतीमधील २६१ धरणांमध्ये ४०.१७ टक्के साठा आहे.

दिवसभरात वाढली टँकरची संख्या

राज्यात मंगळवारपर्यंत विविध ठिकाणी एकूण तीन हजार ६२२ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात आला होता. हा आकडा दिवसभरात ३६ टँकरने वाढून थेट तीन हजार ६५८वर पोहोचला. राज्यभरात बुधवारी तीन हजार ६५८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये तीन हजार ५६३ खासगी, तर ९५ सरकारी टँकरचा समावेश होता. तब्बल सात हजार ६२३ वाड्या आणि दोन हजार ९४९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

‘सरकारने दुष्काळाकडे लक्ष द्यावे’

मुंबई : ‘संपूर्ण राज्य दुष्काळाने बेजार आहे. बहुतांश भागांत भीषण टंचाई आहे. राज्यातील लोकसभा निवडणूक संपली असल्याने राज्य सरकारने आता दुष्काळाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे’, असे मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली. ‘धरणातील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावे, वाड्या व वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणीटंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पाणी मिळावे, तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी आचारसंहिता शिथिल करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात’, असेही त्यांनी नमूद केले.
नाशिकमध्ये अघोषित पाणीबाणी! शनिवारी दिवसभर, तर रविवारी सकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद
नाशकात अघोषित पाणीबाणी

नाशिक : नाशिक शहरासाठी गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातील पाणी आरक्षण आणि ३१ जुलैपर्यंत पाणीपुर‌वठा करण्याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे प्रशासनाने अखेर अघोषित पाणाकपातीला सुरुवात केली आहे. तिन्ही धरणांत शहरासाठी एक हजार ९१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक असून, ते १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे १८ दिवसांची तूट भरून काढताना नागरिकांचा रोष होऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीची कामे काढून कपातीचा अनोखा मार्ग शोधला आहे. त्यानुसार जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शनिवारी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरवासीयांना पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.