विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला घरघर लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. एकतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे गटात नाशिकमध्ये मोठी फूट पडली आहे. आता नाशिकमधलाच ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. या नेत्याने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी ‘हो, मी पक्षात नाराज आहे’ असं सांगितलं. ठाकरे गटासाठी हे चांगले संकेत नाही. पुढच्या काही दिवसात ठाकरे गटात आणखी एक भूंकप होऊ शकतो.
“राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहराचे काही प्रश्न असतात ते मांडण्यासाठी भेटलो” असं सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर सांगितलं. “मीच नाही, तर पक्षात 10 ते 12 जण नाराज आहेत. संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही. पक्ष संघटनेत बदल करतांना विश्वासात घेतले नाही म्हणून नाराजी आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत” असं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं.
पण अजून काही बदल दिसत नाही
“पक्षासाठी एवढं काम केलं. आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला. याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितलं. अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली. पण अजून काही बदल दिसत नाही. विलास शिंदेंची इच्छा होती, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा. पण तसे झाले नाही. माझी नाराजी स्वतःवर आहे” असं सुधाकर बडगुजर म्हणाले.
निर्णयाबद्दल अजून काही ठरलं नाही
“संघटनेतील काही फेरबदलामुळे अनेकजण नाराज आहेत. विलास शिंदेसोबत मी काम केलेलं आहे. राजाभाऊ वाझेंची ज्यावेळी उमेदवारी झाली तेंव्हा आम्ही काम केलं. विरोधकांचं वार असतानाही राजाभाऊ वाझे निवडून आले. विलास शिंदेंची इच्छा होती, त्यांना संधी मिळायला पाहिजे होती. माझी नाराजी कोणावर मी स्व:त नाराज आहे. निर्णयाबद्दल अजून काही ठरलं नाही” असं सुधाकर बडगुजर म्हणाले.