Lok Sabha Result 2024: भारत जोडो, प्रचार आखणीला मिळाले यश; शेतकरी प्रश्नांबाबत रणनीतीही सफल

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासून सुरू असलेला संघर्ष, अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा लढवल्यानंतरही काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मुसंडी मारली. मुख्य म्हणजे, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. यावेळेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक १२ जागा जिंकल्या. पक्षाने मतदारसंघनिहाय प्रमुख नेत्यांवर दिलेली जबाबदारी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मिळालेली साथ आणि विदर्भात भारतीय जनता पक्षाविरोधातील लाट या सगळ्याचा फायदा यावेळी काँग्रेसला झाला, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण १७ जागा लढविण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीमधील जागावाटप निश्चित होताना काँग्रेसने इतर काही जागांसाठी आग्रह ठेवला होता. मात्र इतर पक्षांच्या दबावामुळे पक्षाच्या पदरी जागा कमी आल्या. यावरून अनेक दिवसांपासून उलट-सुलट चर्चा सुरू असतानाही काँग्रेसने या निवडणुकीत मिळविलेले यश राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यात काँग्रेसला विदर्भात मिळालेल्या जागांचे यश हे पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल उंचविणारे ठरणार आहे. काँग्रेसला विदर्भात आत्तापर्यंत सात जागा मिळाल्या आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर या सर्वाधिक मताधिक्याने जिंकल्या. त्यांनी जवळपास २ लाख ४६ हजार ७३३ इतके मताधिक्य मिळवले. भंडारा गोंदिया या मतदारसंघातून प्रशांत पडोले यांना २७ हजार ६२१, रामटेक येथून श्यामकुमार बर्वे यांना ६६ हजार २७५, गडचिरोली चिमूर मतदारसंघातून किरसान नामदेव यांना १ लाख ४० हजार २३४ इतके मताधिक्य मिळाले.

एकीकडे महायुतीच्या दिग्गज नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरली असतानाच महाराष्ट्रात काँग्रेसकडून केवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हातावर मोजण्याइतक्याच सभा झाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या या यशात महाराष्ट्रातील प्रथम फळीतील नेत्यांची विशेष रणनीती फायदेशीर ठरली. यात काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघनिहाय आपल्या नेत्यांवर विशेष जबाबदारी दिली. चंद्रपूरला विजय वडेट्टीवार, रामटेकसाठी सुनील केदार, अमरावती यशोमती ठाकूर, हातकणंगले सतेज पाटील, धुळे, नाशिक आणि शिर्डी मतदारसंघांसाठी बाळासाहेब थोरात याशिवाय भंडारा गोंदिया येथे नाना पटोले यांनी निवडणुकीची सर्व रणनीती आखून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. त्यातच निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि भारत जोडो यात्रा यांमुळे कार्यकर्त्यांना मिळालेली ऊर्जा या निवडणुकीत पक्षाला फायदेशीर ठरली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

– एकमेव खासदार असणारी काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकावर

– विदर्भातील भाजपविरोधी लाटेचा फायदा

– भारत जोडो यात्रेमुळेही लाभ

– कार्यकर्त्यांना मिळाली नवी ऊर्जा

शेतकरी प्रश्नाबाबत रणनीती

काँग्रेसला या निवडणुकीत मिळालेल्या यशात विदर्भाचा वाटा महत्त्वाचा मानला जात आहे. विदर्भातील यशाबाबत काँग्रेसच्या नेते मंडळींनी दाखविलेली एकजूट कामी आल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे येथील अनेक मतदारसंघांत केंद्र सरकारविरोधात लाट होती. या अनुषंगाने काँग्रेसने रणनीती आखत या निवडणुकीत विजयाचा मार्ग सोपा केल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येते.

मुंबईतील यशही कौतुकास्पद

काँग्रेसच्या या यशात मुंबईत काँग्रेसला मिळालेली एक जागा सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक असताना त्यांच्या वाट्याला उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ आला. मात्र वर्षा गायकवाड यांनी या ठिकाणी विजय मिळविला. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून गेलेले असतानाच मुंबईतील हे यश नक्कीच आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीत पक्षाला नवी उभारी देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु या यशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मिळालेली साथही मोलाची मानली जात आहे.