बदलापूरच्या प्रगतशील शेतकरी दर्शना दामले यांनी अथक परिश्रमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय. काही वर्षांपूर्वी ओसाड माळरान असलेल्या जागेत त्यांनी सेंद्रिय शेती करत आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागांसोबत भाजीपाल्याची लागवड केलीये. शेतीला त्यांनी पशुसंवर्धनाचीही जोड दिली आहे.
बदलापूरजवळच्या जांभीळघरमध्ये ५ एकर जागेत त्यांनी दापोली कृषी विद्यापीठातून १०० आंब्याची झाडं आणून लावली. आज त्यांना प्रत्येक झाडापासून किमान ५०० ते ६०० फळांचं उत्पादन मिळतं.
यासोबत नारळ, काजू, फणस, चिक्कू, केळं अशी फळबागही त्यांनी फुलवली. त्यांनी ३० गुंठ्यात भातशेती, तर २० गुंठ्यात भाजीपाला लावलाय.
शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाचीही जोड देत आज १० गीर गायी आणि ५ ते ६ म्हशीही त्यांच्याकडे आहेत. शेतीत शेणखत, गोमूत्र, झाडांचा पालापाचोळा तसच गांडुळखताचाच वापर त्या करतात. त्यांच्या शेतातली सर्व उपकरणं ही सौरउर्जेवरच चालत असून यामुळे वीजेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.
शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी याठिकाणी मसाल्याची पिकं आणि औषधी वनस्पतींचीही लागवड केलीय. शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न हवं असेल तर त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीची कास धरायला हवी असा त्यांचा आग्रह आहे.
एकीकडे नापिकी, वाढता उत्पादन खर्च यामुळे तरूण वर्ग शेतीपासून दूर जातोय. अशातच दर्शना दामलेंसारख्या गृहिणीनं शेतीत केलेली ही प्रगती तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.