Kalyan Crime : आरोपी विशाल गवळीचे 3 भाऊ सुद्धा तडीपार, डीसीपी अतुल झेंडे यांची मोठी कारवाई

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार आणि हत्या करणाऱ्या विशाल गवळी याच्या तीन भावांना आता कल्याण झोन तीन पोलीस उपयुक्त अतुल झेंडे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. आकाश गवळी, शाम गवळी, आणि नवनाथ गवळी असे या तीनही आरोपींची नावे आहेत. या तिघांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांना परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याने पुढील २ वर्षांसाठी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सदर गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश गवळी (33), शाम गवळी (34), आणि नवनाथ गवळी (28) या तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे त्यांनी चक्कीनाका परिसरात दहशत निर्माण केली होती. या तिघांच्या कारवायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते.

या अनुषंगाने कोळसेवाडी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५ नुसार तडीपारीचा प्रस्ताव डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडे सादर केला होता. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गवळी बंधूंना पुढील २ वर्षांसाठी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सदर गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यात सोडण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी अशा सक्रिय गुन्हेगारांची यादी तयार केली असून भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

नेमकी घटना काय?

कल्याण पूर्वेत गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिला घरी नेलं होतं. आरोपीने पीडितेवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची हत्या केली होती. आरोपीने हत्या केली तेव्हा त्याची पत्नी घरी नव्हती. ती एका खासगी बँकेत नोकरी करत असल्याने कामाला गेली होती. त्याची पत्नी संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने तिला सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मुलीच्या मृतदेहाचा बंदोबस्त कसा करायचा? याबाबत ते ठरवतात.

आरोपी त्याच्या मित्राला रिक्षा घेऊन बोलावतो. त्यानंतर ते मृतदेह बॅगेत भरुन कल्याण पश्चिमेला जावून बापगावात जावून एका निर्जनस्थळी फेकून दिलं होतं. या आरोपीच्या घराबाहेर असलेल्या रक्ताच्या डागावरुन पोलिसांनी घटनेची उकल केली होती. आरोपी त्याच्या सासरवाडीला शेगावला गेला होता. पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली होती. तिची चौकशी केल्यानंतर आरोपीला शेगावहून अटक केली होती.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)