Jayant Patil: भाजपला केलेलं एकही काम सांगता येत नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल

पुणे : ”देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेलेत. कारण भाजपला एकही केलेलं एकही काम सांगता येत नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. आमदार अशोक पवार जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, देविदास भन्साळी आदी उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले की, ”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले करोनाच्या काळात मोदींनी लस काढली आणि त्या लसीमुळे लोकांचे प्राण वाचले आणि म्हणून कोरोना लसीकडे पाहून मोदींना मत द्या. आता त्यांनी लस काढली, आपले प्राण वाचले म्हणून मते यांना द्या तर मग हाच फॉर्मुला असेल तर काँग्रेस पक्षाने पूर्वी पोलीओची लस काढलेली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत दिले पाहिजे”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
राज्यात उष्णतेची लाट, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० पार, वेदर रिपोर्ट

देशात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर, १८% जीएसटी हे लोकं २१% टक्के करतील. पेट्रोलची किंमत १०५ रुपयांवरून ११५ रुपये करतील तर डिझेलची किंमत ११० रुपये करतील आणि गॅस सिलेंडर १५०० रुपयांवर नेतील. भारतावर २१० लाख कोटी रुपयांचं कर्ज करून ठेवलेलं आहे. हे २१० लाख कोटी कर्ज फेडण्यासाठी याच्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे”, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.