अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली असून, जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे.वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसला आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक भागांना आयएमडीकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी प्रतितास एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये देखील पावसाची शक्यता आहे.
राज्यात गारपिटीची शक्यता असल्यानं हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं हवामान विभागानं म्हटलं आहे.