गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून कोकणामध्ये उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे.
राज्यात 22 मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, मात्र त्यानंतर पावसाला ब्रेक लागू शकतो अशी माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आणि रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.