Prakash Mahajan Vs Nitesh Rane : नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही, अशी टीका करताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणे यांची तुलना लंवग आणि वेलचीशी केली होती. त्यानंतर आता भाजपाचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय.
राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॉल चालू
नारायण राणे यांनी मला धमकी दिली, असं सांगितल्यानंतर प्रकाश महाजन यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलंय. नारायण राणे यांच्या फेसबुक खात्यावर एक निवेदन करण्यात आलं. त्यांनी या निवेदनात जी भाषा वापरली ती एका प्रकारची धमकीच आहे. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॉल चालू आहेत. मी राजकारणात कोणावरही असभ्य भाषेत टीका केलेली नाही. नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा तर प्रश्नच नाही. राजकारणात जर टीका सहन होत नसेल तर ते योग्य नाही, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय.
मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी…
महाजन यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलंय. मी उद्या सकाळी मी संभाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मी साडे दहा वाजता येऊन उभं राहतो. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मारावं. मी त्यांच्या धमकीला घाबरणारा नाही. मी महाजन आहे, हे त्यांनी विसरू नये, असं खुलं आव्हानंत प्रकाश महाजन यांनी दिलंय. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं पाहिजे. धमकी देणारे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर जनतेचं काय होईल? असा सवालही महाजन यांनी केला आहे.
लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका सहन होत नसेल तर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये. मला नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करू नये. मी उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उभा असेल. हिंमत असेल तर त्यांनी मला जे करायचं आहे ते करावं, असं खुलं आव्हान प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना दिलंय.
नारायण राणे यांच्या निवेदनात नेमकं काय आहे?
टीव्ही-9 च्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत, असं नारायण राणे यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.
आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली
तसेच, प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात ? असे सवालही नारायण राणे यांनी विचारले आहेत.
तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून…
आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलटया करायला लावेन, असा इसाराच नारायण राणे यांनी केला.