लाडके बहीण-लाडका भाऊ एकत्र आले असते, तर दोन्ही पक्ष टिकले असते, राज ठाकरेंचा टोला
मुंबई : लाडके बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता, यावेळी राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे काय म्हणाले?

आपल्याला २२५ ते २५० जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील, त्यांनाच तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं म्हणजे मी पैसे काढायला मोकळा, असा समज करुन घेऊ नका, मनसेचे नेते काहीही करुन मला सत्तेत बसवायचे आहेत, काही जण हसतील पण हे घडणार म्हणजे घडणार, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

त्यांच्यासाठी मीच रेड कार्पेट घालतो

येणाऱ्या विधानसभेला न भूतो न भविष्यति असं घमासान होणार आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हे समजतच नाहीये. आमच्या पक्षातील काही पदाधिकारी सांगत होते, की दोन-तीन जण पक्ष सोडणार आहेत, मी म्हणतो, की तुम्ही इतर पक्षात जाणार असाल तर त्यांच्यासाठी मीच रेड कार्पेट घालतो. स्वतःच्या भविष्याचा सत्यानाश करुन घ्याल तो वेगळाच, त्यांचंच स्थिर नाही तुम्हाला कुठे घेणारेत? गेल्या लोकसभेला पाहिलंत ना, वर्षापर्यंत घुसले, आता विधानसभेला कुठेकुठे घुसतील माहिती नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे यांनी नुकताच विधानसभेच्या २०० जागांचा आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीबाबत ते नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीतील बैठकीत त्यांनी मतदारसंघनिहाय समन्वयकांची नेमणूक करून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार दोन दिवसांपासून राज ठाकरे यांनी या सर्व समन्वयकांचे अहवाल मागवून घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी राज्यातील विधानसभेच्या सुमारे २०० जागांचा आढावा घेतला. त्यामुळे मनसे विधानसभेच्या किती जागा लढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.