कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे प्रवासी नेमके कसे पडले आणि नेमकं काय घडलं होतं, याविषयीची धक्कादायक माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. “हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभे होते आणि गर्दीत त्यांना एकमेकांचा धक्का लागला. त्यातून त्यांचा तोल ढासळल्याचं समजतंय. रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती दिली. लोकलमधील आठ ते नऊ प्रवासी रेल्वे रुळावर पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर 9.50 च्या सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ते खाली पडले,” असं ते म्हणाले.
याविषयी ते पुढे म्हणाले, “एका जखमी प्रवाशाने माहिती दिली की तो फुटबोर्डवरून प्रवास करत होता. त्याच्या पाठीला त्याची बॅग लटकलेली होती. त्या बॅगेला अडकल्यामुळे ही घटना घडली. दोन्ही लोकल ट्रॅकमधील अंतर दीड ते दोन मीटरचं असतं. एक ट्रेन कसाऱ्याकडे जात होती. एक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असताना हा अपघात झाला.”
अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे महत्त्वपूर्ण निर्णय
“या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने निर्णय घेतलाय की नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतले जाणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल. तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
त्याचप्रमाणे मध्य रेल्वेनं कल्याणपासून कसाऱ्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचा प्लॅन केला आहे. सोबतच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका प्लॅन केली आहे. दिवा आणि दादरपासूनदेखील सीएसएमटीपर्यंत पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचं प्लॅनिंग झालं आहे. कुर्ल्यापर्यंत त्याचं काम पूर्ण झालं आहे. कुर्ल्याच्या पुढे जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचसोबत 15 कोचचे लोकल वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सिग्नलिंगची सिस्टिम अपग्रेट केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.