महाराष्ट्रातील महायुती सरकाराचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. मात्र यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र अजित पवार हे या अधिवेशनात उपस्थित राहिलेले नाहीत. गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मोठी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांचे नागपूर नगरीमध्ये स्वागत आहे. आज अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांचे ते मार्गदर्शन करतील. अधिवेशन काळामध्ये आमची संख्या आमदारांची जास्त असल्याने विरोधी पक्ष नेते पदाचा जो दावा आहे, तो आम्ही सोडलेला नाही. आजही विरोधी पक्ष नेता विधानसभेत शिवसेनेचा व्हावा ही आमची भूमिका आहे मागणी आहे. माझ्या नावाची चर्चा घरी असली तरी देखील विरोधी पक्षनेता कोण व्हायचं व्हावं, याचा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे घेतील. मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी नेटाने पार पाडेन, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
छगन भुजबळ या वयात काय बंड करणार? जर बंड करायचं असते तर त्यांनी आधीच केलं असतं. पण आता ते काय बंड करणार, त्यांचे वय होऊन गेले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालेला नाही. छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको. समोरासमोर यायला नको म्हणून अजितदादा नॉट रिचेबल झाले असतील, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला.