heatstroke: सावधान! राज्यात उष्माघाताचे रुग्ण २०० पार, ‘या’ जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये रुग्णांची संख्या २००च्या पलीकडे गेली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याचा दाह अधिक असल्याने उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, नाशिक, बुलढाणा, जालना, धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यांमध्ये उष्माघाताच्या २०५ रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक (२३), बुलढाणा (२१), जालना आणि धुळे (प्रत्येकी २०) या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मार्च महिन्यात राज्यभरात उष्माघाताच्या ४० रुग्णांची नोंद झाली होती, तर एप्रिलमध्ये हा आकडा १६५वर गेला. धुळे येथे २६ एप्रिलपूर्वी उष्माघाताच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.
Weather Updates: महाराष्ट्रात आठवडाभर अवकाळीची शक्यता; कसे असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यांना फटका?
राज्यामध्ये २६ एप्रिल ते ५ मेपर्यंत २१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जालन्यामध्ये सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २० झाली आहे. त्याखालोखाल नाशिक आणि बुलढाण्यामध्ये प्रत्येकी सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक आणि बुलढाण्यातील रुग्णांची संख्या अनुक्रमे २३ आणि २० वर पोहोचली आहे. धुळ्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे.

जिल्हावार रुग्णसंख्या

नाशिक २३, बुलढाणा २१, जालना २०, धुळे २०, सोलापूर १८, सिंधुदुर्ग १०, उस्मानाबाद ८, पुणे ७.