एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करण्यामागे नेमकं तुमचं काय कारण होतं, असा प्रश्न विचारला असता शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे हे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. परंतु बाळासाहेबांची जी पद्धत होती, ती उद्धव साहेबांमध्ये आम्हाला दिसून आली नाही. बाळासाहेब गेल्यानंतर जो काही कारभार चालू झाला, तो आम्हाला पटला नाही,” असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे महायुतीत नाराजीचा सूर असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
बंड का पुकारलं?
“आम्ही कधी बाळासाहेबांना भेटायला गेलो, की ते आमच्या पाठीवर थाप मारायचे, काय-कसं चाललंय अशी आमची विचारपूस करायचे. एकदा मी माझ्या वाढदिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. तेव्हा आम्ही सर्व पदाधिकारी खाली बसलो होतो. बाळासाहेबांनी मला सांगितलं की, “खाली बसायचं नाही, इथे माझ्या बाजूला बसायचं. खुर्ची देणाराही मी आहे आणि घेणाराही मीच आहे.” ही आपुलकी आम्ही त्यावेळी अनुभवली होती. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होतो. याआधीही आम्ही सांगितलं की महिलांनी किती हस्तक्षेप करावा याला काही मर्यादा असतात. म्हणून मी काल बोलून गेलो की त्यावेळी जर शिंदे साहेबांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर फार वेगळं चित्र असतं. परंतु, ठीक आहे.. काही कारणास्तव आम्ही समजू शकलो. परंतु आदित्य ठाकरेला जे मंत्रीपद दिलं, ते कुठल्याच शिवसैनिकाला पटलं नाही,” असं गोगावले म्हणाले.
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास, आम्ही अनेकांनी शिंदे साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद द्या. पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यांनी प्रतापराव जाधवांना मंत्रीपद दिलं. ते त्यांच्या मुलाला खुशाल मंत्रीपद देऊ शकत होते. तरीही त्यांना ते पटलं नाही. याला मोठेपणा म्हणतात. या घडामोडींमागे वहिनी, वहिनींचे नातेवाईक असा सगळा लवाजमा होता. त्यामुळे इच्छा असूनही उद्धव साहेब काही करू शकत नव्हते. हे सर्व जेव्हा आमच्या दृष्टीकोनात आलं, तेव्हा आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उठाव करून बाहेर पडलो.”
महायुतीत नाराजीचा सूर?
महायुतीमध्ये शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न होतोय का? सरकारमधील शिवसेना मंत्र्यांचा नाराजीचा सूर दिसून येतोय, यावर काय प्रतिक्रिया द्याल, असा प्रश्न विचारला असता भरत गोगावले म्हणाले, “असं काही नाही. जी मंडळी विरोधात असतील ती जवळ करून तिथली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. सत्यजीत पाटणकरांचा विचार केला तर तिथे आमचे शंभुराजे आहेत. मग युतीमध्ये तिथली जागा शंभूराजेंनाच मिळणार. ती पाटणकरांना आम्ही देणार नाही.
भाजपकडून मित्रपक्षांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, या प्रश्नावर गोगावलेंनी स्पष्ट केलं, “कोणीच कोणाचं अस्तित्व संपवू शकत नाही. तुमचं चालणं, बोलणं, वागणं यावर तुमचा पक्ष चालतो आणि पक्ष संपतो. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्या पद्धतीने आमच्या पक्षाला शह देण्याचं आणि संपवण्याचं काहीच कारण नाही.”