देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो , मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी मनोज कुमार यांच्याबद्दल व्यक्त केल्या भावना

From Modi to Fadnavis, everyone expressed their feelings about Manoj KumarImage Credit source: tv9 marathi

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप योगदान दिलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या चित्रपटांनी लोकांच्या मनावर राज्य केलं.

त्यांच्या निधनानंतर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत तसेच अनेक नेतेमंडळींनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात भारताचे पंतप्रधान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्यापर्यंत सर्वांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनील आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख:

सुनील आंबेकर यांनीही प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल अत्यंत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे,”दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मनोज कुमारजी यांनी देशभक्तीशी संबंधित अनेक चित्रपटांमधून आपली एक खास छाप सोडली आहे. त्यांचे देशभक्तीपर चित्रपट सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृतीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांना आशीर्वाद देवो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटलं आहे. “दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आयकॉन होते, जे त्यांच्या देशभक्तीच्या आवेशासाठी विशेषतः लक्षात ठेवले गेले, जे त्यांच्या चित्रपटांमध्ये देखील दिसून आले. मनोज जी यांच्या कार्यांनी राष्ट्राभिमानाची भावना प्रज्वलित केली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह आहेत. ओम शांती”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झालं आहे. एक अष्टपैलू कलाकार, ज्यांना प्रेमाने ‘भारत कुमार’ म्हणून ओळखलं जातं. ज्यांनी देशभक्तीला सुंदरपणे मूर्त रूप दिलं आणि आपल्या प्रतिष्ठित चित्रपटांद्वारे भारतीय सामाजिक मूल्यांना जिवंत केलं. ‘मेरे देश की धरती’ किंवा ‘भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं’ यांसारखी प्रतिष्ठित गाणी मी जेव्हाही ऐकतो तेव्हा मला आनंद होतो. मनोज कुमारजी, अशा खोल भावना जागृत केल्याबद्दल धन्यवाद . ‘मैं भारत हूं’ हे हृदयात नेहमी गुंजत राहील. भारतीय चित्रपटसृष्टीने एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावले आहे आणि त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे “मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांचे आज दीर्घआजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपला आहे.

आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. आपल्या सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. त्यांनी केलेल्या सिनेमांमधून बदलत्या भारतीय परिस्थितीचे चित्रण दाखवण्याचा प्रयत्न केला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. या कलावंताला मी माझ्या आणि शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”

अशा पद्धतीने मनोज कुमार यांच्या निधनानंतर सर्वांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)