शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये देखील मोठी फूट पडली होती. अजित पवार महायुतीला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले, तर दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार मतदारसंघातील कामे होत नसल्यानं अस्वस्थ आहेत. आपणही सत्तेत जायला हवं असा सूर या आमदारांचा आहे. यावर आता भाजपचे मंत्री आणि नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
आमदारांनी काय मागणी केली हे माझ्या काही कानावर नाही, त्यामुळे मला काही माहिती नाही. मात्र इतर पक्षातील अनेक लोकांना आपलं भविष्य हे अंधकारमय वाटत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील अनेक लोक तसेच शरद पवार साहेबांच्या पक्षातील अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत. कारण आता त्यांना त्यांच्या पक्षात पुढचं भविष्य दिसत नाही. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या पद्धतीने पुढे जातो आहे, देशाची घोडदौड ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून तसेच, देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा कामाचा आवाका, त्यांच्या कामाची पद्धत यामुळे अनेकांची भाजपात प्रवेश करण्याची इच्छा आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची तयारी आहे, यावर देखील यावेळी महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही कुठे त्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांनी जिथे आहे तिथे राहावं आणि लढावं असं महाजन यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांवर हल्लाबोल
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावं, आता लोकही त्यांना ऐकायला तयार नाहीत. सकाळ झाली की रोजच त्यांची काही ना काही बडबड सुरू राहते. संजय राऊत हा माझ्यासाठी बोलण्यासारखा विषय नाहीये, असा हल्लाबोल यावेळी महाजन यांनी केला आहे.