राज ठाकरे-उद्धव ठाकरेImage Credit source: गुगल
महाराष्ट्र धर्म, मराठी यावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सक्तीच्या हिंदी धोरणाचा वेगळा इफेक्ट राज्याच्या राजकारणात दिसून आला. कायम एकमेकांविरोधात तोफ डागणारे दोन पक्षाच्या नेतृत्वाने अचानक मनोमिलनाचे संकेत दिले आहे. राजकारण केव्हा आणि कसं कूस बदलेल हे सांगता येत नाही. आता तर ‘मौका भी है और दस्तूर भी है’ असं वातावरण आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागील कारणांची मीमांसा पण करण्यात येत आहे. तर त्याच्या परिणामांची आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा ऊहापोह पण होत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्यामागची ७ करणं
1. शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात जून 2022 मध्ये मोठे राजकीय वळण आले. कोरोनानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले. पक्षातील आमदार सोबत घेऊन त्यांनी भाजपासोबत युती केली. त्यासाठी शिवसेना-शिंदे गट अस्तित्वात आला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरचे नाट्य आपल्यासमोर आहे.
दरम्यान 2023 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना हे ना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. तर उद्धव गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्हं दिले. शिवसेना फुटली, चिन्हं गेलं.
लोकसभेत सरस कामगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला विधानसभेत मोठा झटका बसला. महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं. ईव्हीएम मतदानात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा सुपडा साफ झाला. आता राजकीय अस्तित्वाची निकाराची लढाई पक्षासमोर उभी ठाकली आहे. राज ठाकरे यांनी दिलेली हाक त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका हातची जाऊ द्यायची नसेल तर मराठीच्या मुद्यावर दोन्ही बंधु एकत्र येऊ शकतात. ही निवडणूक पुढील मोठ्या प्रयोगासाठी लिटमस् टेस्ट ठरू शकते.
2. विधानसभा निवडणुकीत निकालाने झोप उडवली
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर आणि नवीन चिन्हासह उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. खरी तर ही त्यांच्यासाठी अग्नि परीक्षाच होती. उद्धव ठाकरे गटाने राज्यात 95 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण त्यांना केवळ 20 जागांवर विजय मिळवता आला. त्यातील 10 जागा मुंबईतील होत्या. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 81 जागांवर उमेदवार दिले आणि 57 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आता मराठी भाषा, महाराष्ट्र या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात.
3. मनसेच्या विधानसभा खात्यात शून्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने घसरल्याचे दिसून आले. पक्ष स्थापनेपासून मराठीच्या झंझावातावर मनसेने मोठा विजय मिळवला होता. 2009 मधील निवडणुकीत मनसेने 13 जागांची कमाई केली होती. तर 214 मध्ये त्यांना एकाच जागेवर समाधान मानवे लागले होते. 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांना साधं खातंही खोलता आलं नाही.
4. हा पराभव जिव्हारी
लोकसभेत महायुतीला बिनशर्त सहकार्य केलं. एकही उमेदवार दिला नाही. तरीही महायुतीने माहीममध्ये मुलाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव जिव्हारी लागला. माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत यांनी शिंदे गट आणि मनसेला धक्का दिला. आता मनसेला राजकीय प्रवाहात मोठ्या चमत्काराची गरज आहे. मराठी आणि महाराष्ट्र या मुद्याभोवती राजकारण तापवले तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला भविष्यात चांगले यश मिळू शकते असा राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
5. मुंबई महापालिका निवडणूक
महापालिका निवडणुका तोंडावर आहे. ही निवडणूक 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागा अधिक मिळणार नाही. तीन बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील. त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफरटत जावं लागेल ही मनसेची भीती आहे. तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाने 82 जागा जिंकल्या होत्या. मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती. भाजपाने विधानसभेत मोठी झेप घेतली आहे. मुंबईत पक्षाचे मजबूत जाळे तयार केले आहे. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे गटासमोर मोठे आव्हान आहे.
6. दोघांनी एकत्र यावे ही लोकभावना प्रबळ
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही लोकभावना आहे. एकत्र आल्यानंतर त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो, असे जनमत आहे. तर सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी, नित्याचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे. त्यांना एक चांगल्या पर्यायची प्रतिक्षा आहे. राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते.
7. राजकीय अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
पाच वर्ष राज्यातील सरकार स्थिर आहे. बहुमताचा मोठा आकडा सरकारकडे आहे. त्यामुळे पक्ष फुटीपासून ते राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असेल. तर मनसेला प्रभावाचा परीघ वाढवायचा आहे. त्यासाठी दोन्ही बंधु एकत्र आल्यास पूरक भूमिकेचा फायदा होऊ शकतो.