EVM Hacking Row: वायकरांच्या मेहुण्याने वापरलेला मोबाइल गायब झाल्याचा अनिल परब यांचा दावा;  ठाकरे गट उत्तर पश्चिमच्या निकालाप्रश्नी न्यायालयात जाणार

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरुन शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरु असलेले शीतयुद्ध आता लवकरच न्यायालयात पोहचणार आहे. याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. तसेच आदित्य म्हणाले की, अमोल कीर्तिकर यांची जागा आम्हीच जिंकलेली आहे. मात्र इलेक्शन कमिशन म्हणजे ‘एंटायरली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन’ झालेले आहे. ह्या प्रकरणी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असून आम्ही हा विजय मिळवणारच असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला. तर या निकाल घोळावर तांत्रिक बाबींवर भाष्य करतानाच निकालादरम्यान वायकरांच्या मेहुण्याने वापरलेला मोबाइल गायब झाला असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी यावेळी केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी वरील पुनरुच्चार केला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह अनिल परब, अनिल देसाई, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमोल कीर्तीकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली असती तर भाजपच्या २४० काय ४० जागाही आल्या नसत्या, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगाविला.
Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेलीची केली निवड; वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने केली मोठी घोषणा

यावेळी अनिल परब म्हणाले की, मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यासाठी कोणाला प्राधिकृत केले आहे, यासंदर्भात सहायक निवडणूक अधिकारी यांना विचारले असता त्यांच्याकडे कोणतीच माहिती नव्हती. त्यासंदर्भात कुठलेही अधिकृत पत्रही नसल्याचे सांगतानाच मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरायचा असेल तर एक नियम आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांकडे कुठलीच माहिती नव्हती, असा दावा परब यांनी केला.
Gautam Gambhir: गौतम गंभीर मुख्य कोच होताच भारतीय संघातून ४ दिग्गजांना मिळणार नारळ; BCCI मान्य केल्या या ५ अटी

हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि जनआधार पार्टीचे सुरिंदर अरोरा मोहन यांनी पंडिलकर यांच्याबाबत आक्षेप घेतल्यानंतर तेव्हा तो मोबाईल काढून बाहेर पाठवला गेला. मग हा मोबाईल बाहेर गेला तर डाटा एन्ट्रीसाठी इनकोअर प्रणालीत माहिती भरण्यासाठी कुठला मोबाईल वापरला, त्यासाठी कोणाला अधिकार दिले, असे सवाल उपस्थित करत याची सर्व माहिती आम्हाला मिळायला हवी, अशी मागणी परब यांनी यावेळी केली. मात्र, हा मोबाईल ज्यावेळेला बाहेर गेला त्यावरून कोणाला फोन केले आणि जो फोन प्रत्यक्षात वापरला त्याचे टॉवर लोकेशनही आमच्याकडे असल्याचा दावा करत मतमोजणीत गडबड झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा झालेला विजय सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आमच्याकडून हिरावून घेतला असल्याचा आरोप परब यांनी या पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक अधिकाऱ्यांवरही केली टीका

या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्यावरही अनिल परब यांनी निशाणा साधला. सुर्यवंशी यांच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत, कोणकोणत्या प्रकरणात त्यांना निलंबित केले आहे, भ्रष्टाचाराची किती प्रकरणे सरकारकडे प्रलंबित आहेत, हे सर्व यानिमित्ताने तपासून पाहिले पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.