EVM अनलॉक करण्यासाठी मोबाईलवर खरंच OTP येतो? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सत्यता समोर

प्रतिनिधी, मुंबई : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येत नाही. कारण या यंत्रात वायरलेस संदेशवहनाची क्षमता नाही. इव्हीएमचे कुठल्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसून त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही, असे स्पष्टीकरण मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यंवशी यांनी दिले आहे. मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराच्या सहाय्यकाने अधिकृत व्यक्तीचा मोबाईल फोन अनधिकृतपणे वापरल्याची घटना असून यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होऊन १२ दिवस उलटले तरीही मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची अजूनही चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव केला आहे. या निकालाविरोधात कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांच्या सहाय्यकाने अनधिकृतपणे मोबईल फोन वापरल्याची घटना घडली. त्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी केली असून त्याच्या तपासात सहाय्यकाने जो मोबाईल फोन वापरला त्यावर इव्हीएम अनलॉक करण्यासाठीचा ओटीपी येत असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. याविषयी निवडणूक अधिकारी सूर्यवंशी यांनी रविवारी स्पष्टीकरण दिले.
Ravindra Waikar : मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा, प्रकरण दाबल्याचा आरोप

‘ईव्हीएम’ अनलॉक करण्यासाठी ओटीपी येत नाही

सूर्यवंशी म्हणाल्या की, ‘ईव्हीएम’ अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येत नाही. कारण त्यात ‘वायरलेस कम्युनिकेशन’ क्षमता नाही. याबाबत चुकीची माहिती काही माध्यमातून पुढे आली आहे. ‘ईव्हीएम’ ही ‘ईव्हीएम’ सिस्टीमच्या बाहेरील कोणत्याही ‘वायर्ड’ किंवा ‘वायरलेस कनेक्टिव्हिटीरहित स्वतंत्र उपकरणे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ शकत नाही. यासंदर्भातील मतमोजणीचा सर्व घटनाक्रम उमेदवारांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नोंदविण्यात आला आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

प्रत्येक मोजणी पत्रकावर मतमोजणी प्रतिनिधीची स्वाक्षरी

पोस्टल बॅलेटची मतमोजणी प्रत्येक मतपत्रिका मोजून होते. त्यात कुठलीही इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा समावेश नसतो. प्रत्येक टेबलावरील प्रत्येक मोजणी पत्रकावर मतमोजणी प्रतिनिधीची स्वाक्षरी घेण्यात येत असते, तशीच प्रक्रिया या मतमोजणी दरम्यानही अवलंबविण्यात आली आहे, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. ‘ईव्हीएम’ बद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि भारतीय निवडणूक पद्धतीबद्दल शंका निर्माण केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधित वृत्तपत्रांना नोटीस बजावली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.