Eknath Shinde: कुणालाही पाठीशी घालणार नाही; वरळी ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

मुंबई : ‘वरळी येथे घडलेली घटना दु:खद आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणी पोलिसांशी चर्चा झाली असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे जे होईल ते कायद्यानुसारच होईल. कुणालाही वेगळा न्याय, वागणूक दिली जाणार नाही,’ अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी स्पष्ट केली.

वरळी येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला असून, मृत महिलेचे पती जखमी झाले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे पालघर येथील उपनेता राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा या कारमध्ये असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी कुणालाही वाचविणार किंवा अभय देणार नसल्याचे स्वतः शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे,’ असे शिंदे म्हणाले.

अपघातात शिवसेना पदाधिकाऱ्याच्या सहभागावरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. ‘सध्या विरोधी पक्षाकडे कुठलेही काम राहिले नाही. या घटनेमध्ये कुणाला पाठीशी घातले जाईल, असे समजण्याचे काही कारण नाही. तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला, तरी सर्वांना समान न्याय देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे कुणी कितीही आरोप केले, तरी त्यात फार अर्थ नाही. अशा घटना वारंवार होऊ नयेत, यासाठी सरकार आणि गृह विभाग नक्कीच योग्य त्या उपाययोजना करतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘राजकीय हस्तक्षेप नको’

‘राजेश शहा कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे; पण मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कुणी कोणत्याही पक्षात असले, तरी मी राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको. मुंबईतील वाहनचालकांची पद्धत आणि शिस्त यावर आम्ही सातत्याने बोलत आलो आहोत. उलट दिशेने गाड्या चालवणे, सिग्नल न पाळणे, ट्रिपल सीट जाणे असे सगळेच प्रकार मुंबईत वाढत आहेत. ‘हिट अँड रन’सारखे प्रकार वाढायला लागले आहेत. अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणे गरजेचे आहे. मुंबईची वाहतूक शिस्त आणि सुरक्षा परत आणावी लागेल. वाहतुकीचे नियम पाळले जातील, वाहकांना शिस्त लागेल आणि चुका करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी रस्त्यावर पोलिस दिसावे लागतील,’ असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
Congress च्या घोटाळ्यांची मालिका मोठी, म्हणून त्यांना जनतेने घरी बसवले, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका
मनसेही आक्रमक

‘अत्यंत घृणास्पद असा हा गुन्हा आहे. वाहनचालकाने वेळीच ब्रेक मारला असता, तर आमच्या नाखवा वहिनी आज जिवंत असत्या. बीएमडब्ल्यू वाहनचालकाने ब्रेक लावल्यानंतर गाडी चालू केली नसती, तर नाखवा वहिनी आज जिवंत असत्या. वाहनचालकाने पळून जाण्याच्या नादात त्यांना १०० मीटरपर्यंत फरपटत नेले. त्यामुळे वाहनचालकावर कलम ३०२चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जो कुणी आरोपी असेल, त्यावर कडक कारवाई करावी. आरोपीचे राजकीय संबंध असले, तरी त्यांना सोडता कामा नये. अशा गुन्हेगारांचे राजकीय संबंध असले, तरी आम्ही त्यांना सोडू देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत राहू,’ अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या वेळी दिली.