संजय हा श्रीकृष्णांसोबत नाही तर धृतराष्ट्रासोबत असायचा, त्यांमुळे राऊत यांनी…, शहाजीबापूंची जोरदार फटकेबाजी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णांची उपमा दिली होती, तर स्वत: आपण संजय असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे, महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता तर अंधळ्याधृतराष्ट्राजवळ बसलेला होता, त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं का? राऊत यांनी इतिहासाचा निट अभ्यास करून बोलावं असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांमध्ये संजय राऊत का गुतंत आहेत, हे मला कळत नाही. संजय राऊत हे ट्रम्प, मोदी, चीन, जपान यांच्यावर का बोलत आहेत?  गेल्या दहा वर्षांत मोदी साहेबांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली, त्यामुळे शेअर बाजार हा इतर देशाच्या तुलनेत सगळ्यात कमी कोसळला. मोदी साहेबांवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका, आधी वार्डात निवडून यायचं बघा असा टोला यावेळी शहाजीबापू यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कर्जमाफीच्या पैशांमधून शेतकरी लग्न आणि साखरपुडा करतात असं त्यांनी म्हटलं होतं. यावर देखील शहाजीबापू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री कोकाटे यांचा स्वभाव हा खेळकर आहे, त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर केलेला हा खेळकर संवाद होता. तो काही त्यांच्या अंतकरणातला संवाद नाही, अशा शब्दांमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसला टोला 

यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला आहे.   भरकटलेल्या पक्षा सारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. राहुल गांधी यांना संपूर्ण देशाचा राजकीय व्याप बौद्धिक दृष्ट्या सोसत नाही, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)