दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदेंचे रेल्वे प्रशासनाला पत्र

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंनी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी या घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रही लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडूनही दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे आता यावर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत बोलताना खासदार शिंदे म्हणाले की, ‘दिवा-सीएसटी लोकल चालू करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा काही वर्षांपासून करत आहे. इथे जलदगती लोकलच्या थांब्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. पण या मार्गिकेवर जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवायला हव्यात. पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत जाईल, तेव्हा ते शक्य होईल.

लोकल गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं – श्रीकांत शिंदे

पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, ‘कर्जत-कल्याण भागात मोठ्या प्रमाणावर लोक राहायला गेले आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. तशी मागणीही वारंवार केली जात आहे. पाचवी-सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ झाली. पण सीएसटीपर्यंत ही पाचवी व सहावी मार्गिका जायला हवी. त्यावर रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. त्यानंतर लोकल गाड्या वाढू शकतात. त्याशिवाय कल्याणच्या पुढे तिसरी व चौथी मार्गिका टाकण्यासाठी जमीन अधिग्रहण वगैरे प्रक्रिया चालू आहे.’

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)