Devendra Fadnavis: विधानसभा जिंकेपर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

मुंबई : ‘आपण तीन पक्षांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करून लढलो, मात्र विरोधकांनी केलेला खोटा प्रचार या चौथ्या पक्षाच्याविरोधात आपण तयारीच केली नव्हती. आपल्या अपयशाचे हेच मुख्य कारण आहे,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. आता एकमेकांवर आरोप किंवा पराभवाची विश्लेषणे करत बसू नका, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. ‘मी मैदान सोडून पळणार नाही, विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत मी शांत बसणार नाही,’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे सांगतानाच, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही खुलासा केला. ‘यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घेत ते पचवायचे आणि नवीन निर्धार करायचा असतो. भाजपचे नेतृत्व करत असल्यानेच मी अपयशाची जबाबदारी घेतली. या निवडणुकीत आपण फक्त तीन पक्षांशी नाही, तर चार पक्षांशी लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा प्रचार होता. तो आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही, किंबहुना रोखण्यासाठी तयारी करू शकलो नाही,’ असे ते म्हणाले. ‘काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला आहे. तो टिपलेला आहे. तो जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. मी मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगणार आहे. कोणकोणत्या आमदारांच्या मतदारसंघांत समन्वय नव्हता, हेदेखील मांडेन,’ असे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis : “नितेशला समज दिली, अजितदादा आणि शिंदेंनी प्रवक्त्यांना समज द्यावी वादग्रस्त बोलणे टाळा” फडणवीसांचा सल्ला
‘निकालानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रवक्ते विश्लेषण करीत आहेत. मात्र ही बाब गंभीर असून वादग्रस्त बोलणे टाळा,’ असा थेट सल्ला फडणवीस यांनी यावेळी दिला. ‘विजय-पराजय होत असतो, पण त्यांचे खापर कोणावरही फोडू नका. आता उणीधुणी काढण्याची वेळ नाही. महायुतीतील प्रवक्त्यांनी समजून-उमजून बोलावे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही यावर लक्ष देण्याबाबत सांगितले आहे. नितेश राणे यांनाही बोलताना तारतम्याने बोलण्याची समज दिली आहे. एकमेकांना सोबत घेऊन चला. आता विधानसभेच्या तोंडावर एकाच सुरात बोला. सगळ्यांच्या पक्षांत काही नेत्यांच्या तक्रारी असतील, पण वरिष्ठ नेत्यांनी त्या समजून घ्या. उगाच काही बोलून बातम्या पेरू नका,’ असे सल्लेही फडणवीस यांनी मित्रपक्ष आणि भाजपला दिले.