उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावंImage Credit source: TV9
‘इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल एकनाथ शिंदेंवर चढवला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा आणि आरसा पाहण्याचा खोचक सल्ला दिला.
उद्धव ठाकरे हे बऱ्याच गोष्टी बोलत असतात. रोज मी त्यांना उत्तरं द्यायला लागलो, तर एवढा वेळ माझ्याकडे नाही. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, समजा तेच जर खरे होते आणि हे जर ( शिंदे गट) गद्दार होते तर, महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना मत दिलं आहे का ? असा सवाल देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारला. हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला. महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं, त्यांना तुम्ही गद्दार म्हणत आहात. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आरसा बघितला पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
काल ( 27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. शिंदे हे नुकतेच कुंभमेळ्याला जाऊन आले, त्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंनी शिंदेंचा पुन्हा गद्दार असा उल्लेख करत त्यांना टोला लगावला. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
स्वतःला हिंदू रक्षक समजणारे महाकुंभाला गेले नाहीत,असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार, रोहित पवार यांसारखे नेते कुंभमेळ्यात स्नानासाठी गेले होते. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. ” ज्याचा सतानतवर विश्वास आहे, ज्या व्यक्तीला हिंदू जीवनपद्धती ही प्रिय आहे, असे सगळे लोक कुंभमेळ्यात गेले. काही लोकं नाही गेले, त्यांची वेगळी कारणं असू शकतात. कोणी तिथे गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही, असं मी म्हणणार नाही. त्यांची ,स्वत:ची काही कारणं असतील. जे (कुंभमेळ्यात ) गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया, ते केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण समजूया” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.