Dengue Cases: डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन; ४ वर्षांत ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात साथीचे आजार डोके वर काढतात. गेल्या साडेचार वर्षांत राज्यात डेंग्यूचा उपद्रव सर्वाधिक असून, या कालावधीमध्ये डेंग्यूमुळे १३५ जणांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लू या आजारांच्या तुलनेमध्ये डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
राज्यात २०२० ते २१ जून २०२४ पर्यंत डेंग्यूमुळे १३५ जणांना जीव गमवावा लागला. साथीच्या इतर आजारांच्या तुनलनेत ही संख्या अधिक आहे. २०२० मध्ये डेंग्यूमुळे दहा, तर २०२१ मध्ये ४२, २०२२ मध्ये २७, तर २०२३ मध्ये ५५ जणांना जीव गमवावा लागला होता. यंदा २१ जून २०२४ पर्यंत राज्यात डेंग्यूमुळे एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला आहे. या साडेचार वर्षांच्या कालावधीमध्ये डेंग्यूच्या ४६ हजार ४९० रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे २०२३ मध्ये नोंदवण्यात आले. त्यावेळी ही संख्या १९,०३४ होती. याच कालावधीमध्ये मलेरियामुळे ७४ जणांचे प्राण गेले. राज्यात ६८ हजार ३४५ जणांना मलेरियाची लागण झाली होती. मात्र, मृतांची संख्या डेंग्यूच्या तुलनेत कमी होती, असे माहितीवरून दिसून येते. चिकनगुनियाची रुग्णसंख्या इतर आजारांच्या तुलनेमध्ये कमी होती.

Paper Leak Case Study : दहा-वीस नव्हे मागील ५ वर्षात ६०हुन अधिक पेपरफुटीचे प्रकार; १ कोटी उमेदवारांचे नुकसान
चार वर्षांत ६८३८ जणांना चिकनगुनिया झाला होता. राज्यात या आजारामुळे एकाच्याही मृत्यूची नोंद नाही. २०२१ मध्ये चिकनगुनियाची सर्वाधिक म्हणजे २५२६ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. इतर वर्षांमध्ये ही रुग्णसंख्या तुलनेने कमी होती. यंदा २१ जून २०२४ पर्यंत सर्वांत कमी म्हणजे ७४१ जणांना या आजाराची लागण झाली. चिकनगुनिया विषाणूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय या डासांपासून होतो.